रत्नागिरी - मुंबई - गोवा महामार्गावरील बहादूर शेख जवळील वशिष्टी नदीवरील नवीन पुलाचे काल उद्घाटन करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुलाचे उद्घाटन झाले.
हेही वाचा - संगमेश्वरमध्ये तरुणाकडून 18 गावठी बॉम्ब जप्त, आरोपीला अटक
वशिष्टीवरच्या नवीन पुलाची प्रतिक्षा अखेर संपली
बहादूरशेख येथील वशिष्टी नदीवरील पुलाचे बांधकाम आता पूर्णत्वाकडे गेले आहे. प्रत्यक्षात येथे १२ - १२ मीटर रुंदीचे व २४७.५ मीटर लांबीचे दोन पूल आहेत. त्यापैकी एक पूल पूर्णतः तयार झाला असून, एकेरी वाहतुकीसाठी हा पूल सज्ज झाला होता. नवीन पुलावरून प्रत्यक्षात वाहतूक कधी सुरू होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर काल ही प्रतीक्षा संपली.
गणेशोत्सवापूर्वी या पुलावरून वाहतूक सुरू व्हावी, अशी खासदार विनायक राऊत यांची संकल्पना होती. त्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले होते. खासदार विनायक राऊत यांनी काल राष्ट्रीय महामार्गाचे सर्व अधिकारी, तसेच संबंधित ठेकेदार प्रतिनिधी, अन्य लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पुलाची पाहणी केली. पुलाचा तांत्रिक चाचणी अहवाल, तसेच दोन्ही बाजूचे जोडरस्त्यांची माहिती घेतली. त्यानंतर या पुलाचे उद्घाटन करत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला, त्यामुळे चाकरमान्यांचे आगमन आता नवीन पुलावरून होणार आहे. गणेशोत्सवाआधीच या पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा - रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जाहीर