ETV Bharat / state

Bhaskar Jadhav : 'संजय राऊतजी ही आव्हान देण्याची नाही जोडण्याची वेळ'

author img

By

Published : Jun 25, 2022, 9:19 PM IST

संजय राऊतांनी आव्हानाची भाषा केली होती. ही वेळ आव्हान देण्याची नाही तर जोडण्याची वेळ आहे, असे भास्कर जाधव ( Shivsena Leader Bhaskar Jadhav ) यांनी व्यक्त केलं आहे.

Bhaskar Jadhav Sanjay Raut
Bhaskar Jadhav Sanjay Raut

रत्नागिरी - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Shivsena Rebel Mla Eknath Shinde ) यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात शिवसेना नेते संजय राऊत ( Shivsena Leader Sanjay Raut ) आव्हानाची भाषा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव ( Shivsena Leader Bhaskar Jadhav ) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही वेळ आव्हानं देण्याची नाही, तर जोडण्याची वेळ आहे, असे जाधव यांनी म्हटलं आहे. ते चिपळूणमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करून सांगतो, आम्ही हार मानणार नाही, आम्ही जिंकणार, आमची संपूर्ण तयारी झाली आहे. आता तुम्ही मुंबईत याच, असा इशारा संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना दिला होता. तसेच एकनाथ शिंदे आणि मंडळींनी खूप चुकीची पावलं उचलली आहेत. आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता वेळ निघून गेली आहे, असेही राऊत यांनी म्हटलं होतं.

भास्कर जाधव प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

संजय राऊतांच्या या विधानावर भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भास्कर जाधव म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता, ही आव्हानं द्यायची नाही तर जोडण्याची वेळ आहे. त्यांच्याशी संवाद साधा. त्यामुळे मतभेद कमी होतील, नेहमीच आव्हानं देऊन काही होत नाही.

आपले आमदार का नाराज आहेत, ते का सोडून गेले, का निघून गेले हे समजून घ्यायला पाहिजे. तसेच मी तेव्हाही सांगितलं होतं की, आपल्या कोट्यातील मंत्रिपद इतरांना देऊ नका. पण, शिवसेनेने तेव्हा मुख्यमंत्री पद घेतलं. मात्र, आपल्या कोट्यातील ३ मंत्रीपद अपक्ष आमदारांना का दिली?, असा सवालही भास्कर जाधव यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

'मी शिवसेनेसोबतच आहे' - भास्कर जाधव गुवाहाटील गेल्याची चर्चा होती. त्याबाबत खुलासा करताना जाधव यांनी म्हटलं की, मी पक्ष सोडणार नाही, मी शिवसेनेसोबतच आहे. प्रसारमाध्यमांनी वस्तुनिष्ठ बातम्या दिल्या पाहिजेत. मला दोन वेळा पक्ष सोडायची वेळ आली. सरकार धोक्यात आलंय असं म्हणता येणार नाही. आजही थोडीशी भूमिका आपण घेतली पाहिजे. ती आपलीच माणसं आहेत, त्यामुळे त्यांना चूक सुधारण्याची संधी दिली पाहिजे. संवाद थांबता कामा नये, संवाद झाला पाहिजे, संशयाचं वातावरण दूर केलं पाहिजे, असेही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : शिवसेना आमदारांच्या बंडाळी मागे भाजपचा हात; मनीषा कायंदे यांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.