गणपतीपुळ्यात पर्यटकांना रूम भाड्याने दिल्यास 10 हजारांचा दंड, ग्रामपंचायतीचा अजब फतवा

author img

By

Published : Jul 1, 2021, 6:04 PM IST

गणपतीपुळे ग्रामपंचायतीचा निर्णय

गणपतीपुळ्यात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रूम भाड्याने दिल्यास 10 हजारांचा दंड ठोठावला जाईल, असे पत्रक गणपतीपुळे ग्रामपंचायतीने काढले आहे. त्यामुळे पर्यटकांना रुम मिळत नाहीत, तर लॉज मालकही चिंतेत सापडले आहेत.

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि लाखो गणेश भाविकांचे गणपतीपुळे हे श्रद्धास्थान आहे. समुद्र आणि गणपती मंदिर यामुळे इथे पर्यटक खिळून राहतो. पण या गावात कोरोनाच्या भीतीने सध्या ग्रामपंचायतीने घेतलेला एक निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे. इथे कोरोना आटोक्यात आहे, पण ही रुग्णसंख्या वाढू नये म्हणून ग्रामपंचायतीने अजब फतवा काढला आहे. गणपतीपुळ्यात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रूम भाड्याने दिल्यास 10 हजारांचा दंड ठोठावला जाईल, असे पत्रक गणपतीपुळे ग्रामपंचायतीने काढले आहे. त्यामुळे पर्यटकांना रुम मिळत नाहीत, तर लॉज मालकही चिंतेत सापडले आहेत.

गणपतीपुळ्यात पर्यटकांना रूम भाड्याने दिल्यास 10 हजारांचा दंड, ग्रामपंचायतीचा निर्णय

रूम दिल्यास लॉज मालकांना होणार 10 हजारांचा दंड

गणपतीपुळे ग्रामपंचायतीने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच प्रशासनाने जिल्हाबंदी उठविली असल्याने परजिल्ह्यातून पर्यटक गणपतीपुळे येथे भेट देत आहेत. मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी अद्याप लॉजिंग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. परंतु गणपतीपुळे येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना लॉजिंगधारक रुम वितरित करित असल्याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार प्राप्त झाली आहे. तरी यापुढे मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे लॉजिंग व्यवसाय सुरू करणेबाबत लेखी आदेश प्राप्त होत नाही. तोपर्यंत कोणीही रुम वितरीत करू नये, जे लॉजिंगधारक रुम वितरित करताना आढळतील अशा व्यवसायधारकांवर 10 हजारांचा दंड आकारण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.

बाहेरून पर्यटक आल्यास रुग्णसंख्या वाढण्याची भीती -

दरम्यान, सध्या गणपतीपुळे गावातील रुग्णसंख्या कमी आहे, मात्र बाहेरून पर्यटक आले तर रुग्णसंख्या वाढेल, त्यामुळे ग्रामस्थांच्या काळजीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत आम्ही कोणाला दंड केलेला नाही. तसेच दंड करण्याची वेळ येणार नाही. कारण इथले व्यावसायिक सामंजस आहेत, असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.

व्यवसायिकांमध्ये नाराजीचा सूर -

या निर्णयाने काही प्रमाणात इथल्या व्यवसायिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. गेले दिड वर्ष इथले व्यवसाय बंद आहेत. गावासाठी म्हणून ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र व्यवसाय सुरू करण्यासाठी इथे येणाऱ्या पर्यटकांचे टेस्टिंग करून किंवा वेगळी नियमावली करून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यवसायिक करताहेत.

गणपतीपुळेला येताना सर्व माहिती घेऊनच या, नाहितर...

तर, दुसरीकडे सध्या महाराष्ट्रात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी निर्बंध नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात पर्यटक गणपतीपुळेत दाखल होत आहेत. अशावेळी त्यांच्याकडून स्वाभाविकपणे राहण्यासाठी हॉटेलचा आसरा घेतला जातो. काही पर्यटक रात्री उशिरा देखील येतात. पण या फतव्यामुळे अनेक पर्यटकांना इथे राहायला रूम मिळणे कठिण झाले आहे. अनेक ठिकाणी चौकशी करूनही लाॅज मिळत नसल्याने पर्यटक माघारी किंवा रत्नागिरीत जात आहेत. त्यामुळे एकूणच ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे पर्यटकांना फटका बसू शकतो. त्यामुळे पर्यटकांनो गणपतीपुळेत येताना सर्व माहिती घेऊनच या नाहीतर राहायला रुम शोधण्यासाठी वणवण करावी लागेल.

हेही वाचा - Ashadhi Ekadashi 2021 : नाथांच्या पालखीचे पैठणहून प्रस्थान, 19 जुलैला एसटीतून जाणार पंढरपूरला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.