Ganeshotsav 2021: अष्टविनायक क्षेत्र श्री वरदविनायक; कसे पडले हे नाव? जाणून घ्या..

author img

By

Published : Sep 15, 2021, 6:01 AM IST

ballaleshar temple

श्री वरदविनायक समृद्धी व यश देणारा गणपती म्हणून ओळखला जातो. या येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात 1690 साली सापडली. 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे मंदिर बांधले.

रायगड - अष्टविनायकांपैकी असलेल्या महडच्या श्री वरदविनायक बाप्पाची विशेष ओळख आहे. गणेशोत्सवात महड येथील वरदविनायकाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्तांची हजेरी लागते. या मंदिराची बांधणी हेमांडपंथी आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असून मंदिराचा गाभारा पेशवेकालीन आहे. हा गणपती पुरातन कालीन असल्याची आख्यायिका सांगितले जाते. श्री वरदविनायक समृद्धी व यश देणारा गणपती म्हणून ओळखला जातो. या येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात 1690 साली सापडली. 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे मंदिर बांधले.

अशी आहे आख्यायिका -

फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरु केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. 'तुला लवकरच' पुत्रप्राप्ती होईल' असा त्याने राजाला वर दिला. काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला, त्याचे नाव रुक्मांगद. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्य कारभार त्याच्यावर सोपविला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले.

हेही वाचा - Ganeshotsav 2021: अष्टविनायकांपैकी पहिला मान असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर मंदिराची 'ही' आहेत वैशिष्टे

एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता, तो वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला. त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे कामविव्हल झालेल्या मुकुंदेने 'तू कुष्ठरोगी होशील' असा रुक्मांगदाला शाप दिला. शाप मिळता क्षणीच सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारदमुनी भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला. इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नव गृत्समद. हाच तो ऋग्वेदातील प्रसिध्द मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा कर्ता.

गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहित झाली होती. त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक (भद्रक) वनात तप करू लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, 'तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर. विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला. ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महड क्षेत्र. या ठिकाणी गृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला 'वरद विनायक' म्हणतात.

पुणे–मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आहे हे स्थान -

गृत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो. पुरातन काळात महडचे नांव मणिपूर वा मणिभद्र होते. श्री वरद विनायक महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. ती मुर्ती या मंदिरात ठेवलेली आहे. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व डाव्या सोंडेची आहे. इ. स.1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे–मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे.

कोरोनामुळे मंदिर बंद -

वरदविनायकाच्या दर्शनासाठी देशभरातून असंख्य भक्त येत असतात. आपल्या बाप्पाचे दर्शन घेत पुजा अर्चा करीत असतात. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक नियमावली लावल्याने श्री वरदविनायक बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने गेल्या काही महिन्यांपासून मंदिर बंद आहे. त्यामुळे अनेक भक्तांची हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे मंदिर लवकर सुरु व्हावे, अशी मागणीही भक्तांकडून केली जात आहे.

हेही वाचा - Ganeshotsav 2021 : असा आहे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाचा इतिहास, वाचा....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.