पुणे - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा मान आळंदी देवाची मधल्या रानवडे कुटुंबाच्या 'सर्जा-राजा' बैलजोडीला मिळाला आहे. त्यामुळे रानवडे कुटुंबीयांसह वारकऱ्यांनी या सर्जा-राजाच्या जोडीची भव्य मिरवणूक काढली आहे.
सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस पूर्ण करणाऱ्या पालखी सोहळ्याची लाखो वैष्णव वाट पाहतायेत. येत्या २५ तारखेला हा सोहळा सुरू होतोय. या सोहळ्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे बैल जोडीचा मान. माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा मान परंपरागत कुर्हाडे, घुंडरे, वहिले, रानवडे, भोसले, वरखडे यांच्याकडे असतो. यंदा हा मान पंडीत रानवडे कुटुंबीयांना मिळाला आहे.
आषाढी वारी पालखी सोहळ्याचा हा मान म्हणजे साक्षात विठ्ठलाची सेवा करण्याची संधी असते. म्हणूनच या बैल जोडीला विशेष महत्व असते. बैल जोडी आळंदीत दाखल झाल्यानंतर त्यांची मिरवणूक काढली जाते रानवडे कुटुंबीयांना हा मान मिळाल्यानंतर त्यांनीही मोठ्या श्रध्देन बैलांची मिरवणूक काढली. हा मान मिळाल्याने कुटुंबीय भलतेच खूश आहेत.