ETV Bharat / state

Palghar News: धूम स्टाईल बाईक रायडिंगमुळे वाढले अपघाताचे प्रमाण; वाहतूक नियमांचे वाजले तीनतेरा

author img

By

Published : Feb 10, 2023, 7:40 AM IST

Dhoom style bike riding
धूम स्टाईल बाईक रायडिंग

पालघर जिल्ह्यात वाहतूक नियमांचे तीनतेरा वाजवत धूम स्टाईलने बाईक रायडिंग करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सर्वसामान्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. वाहतूक पोलिसांनी अनेकदा समुपदेशन करूनही या रायडर्सवर काहीच परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे बाईक रायडर्स पोलिसांच्या नाकावर टिच्चून धूम करत त्यांना एकप्रकारे आव्हानच देत असल्याचे दिसत आहे.

धूम स्टाईल बाईक रायडिंग उठली अनेकांच्या जीवावर

पालघर: संपूर्ण जिल्ह्यात दुचाकीच नव्हे तर चारचाकी वाहनेही बेदरकारपणे चालविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात दिसत आहे. विशेषत मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बाईक रायडर्सच्या टोळ्या दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी धूम स्टाईलने दुचाकी चालवत निघतात. अशावेळी इतरांची तर दूरच, स्वतःच्या जीवाचीही काळजी हे बाईक रायडर्स घेत नाहीत. त्यामुळे या टोळ्यांना धूम स्टाईल बाईक रायडिंगचे एकप्रकारचे व्यसनच जडल्याचे दिसत आहे. त्यांच्या या धुंदीमुळे अनेकदा मोठ्या दुर्घटना घडत आहे. अशा अपघातांमध्ये काहींचा बळी गेला तर, अनेकांना अपंगत्व आले आहे.


समुपदेशनाचा परिणाम शून्य: सातत्याने घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांचे समुपदेशन केले जाते. विविध संस्थाही रस्ते सुरक्षेसंदर्भात अनेकदा जागृती करत असतात. असे असतानाही मुंबई व बाहेरील बाईक रायडर्स रहदारीच्या नियमांना तिलांजली देत असल्याने या समुपदेशनाचा काहीही परिणाम जाणवत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे पोलिसांनी औपचारिक समुपदेशनाऐवजी कठोर कारवाईचा मार्ग अवलंबावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चारचाकी वाहनांच्या नंबर प्लेटचा गती नियंत्रण पथकाच्या कॅमेऱ्यात फोटो घेऊन संबंधित वाहनमालकाला दंड आकारला जातो. मात्र, याच कॅमेऱ्यांद्वारे धूम स्टाईल रायडर्सच्या दुचाकींचे नंबर टिपून त्यांच्यावर वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई का करत नाहीत, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.



दुचाकींच्या विक्रीसाठी कंपन्यांनी गाठली मजल: आपल्या दुचाकींची विक्री करण्यासाठी बहुतांश कंपन्या वेगवेगळे फंडे वापरत आहेत. अशा कंपन्यांकडून आपल्या प्रचार-प्रसारासाठी ग्रामीण भागातील महामार्गांवरून युवकांच्या मदतीने भरधाव दुचाकी चालवण्याचे प्रकार केले जात आहेत. दरम्यान, दुचाकींच्या विक्रीसाठी नियमांचे उल्लंघन करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्यांवरही कारवाई करणे गरजेचे आहे, असे मत ऑल इंडिया चालक मालक महासंघाचे प्रवक्ते हरबनसिंग नन्नाडे यांनी व्यक्त केले आहे.



वाहतूक पोलिसांना पडला कायद्याचा विसर: बेजबाबदारपणे वाहन चालवणे तसेच इतरांचा जीव आणि स्वतःची सुरक्षितता धोक्यात आणणे हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. अशा वाहनचालकांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 279 (सार्वजनिक मार्गावर वाहन चालवणे किंवा वाहन चालवणे) आणि 336 (इतरांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारे कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 279 नुसार संबंधित वाहनचालकाला सहा महिन्यांचा कारावास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा केल्या जाऊ शकतात. हा गुन्हा दखलपात्र असला तरी जामीनपात्र आहे. याशिवाय भारतीय दंड संहितेच्या कलम 336 नुसार संबंधित वाहनचालकाला दोन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा ठोठावल्या जाऊ शकतात. हा गुन्हा दखलपात्र असला तरी जामीनपात्र आहे. बेदरकार वाहने चालविणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करण्यासाठी एवढा सक्षम कायदा असतानाही जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांना त्याचा विसर पडल्याचेच दिसत आहे.

हेही वाचा: Viral Video सिनेस्टाईल बाईक राईड भोवली जोडप्यावर गुन्हा दाखल पाहा व्हायरल व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.