उस्मानाबाद- राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच गावातील गाव पुढाऱ्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील बलसूर गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बलसूरमध्ये विरोधी गटाच्या पॅनलच्या 19 पैकी 17 उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची एक हाती सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
17 उमेदवारांचे अर्ज बाद
दरम्यान याविरोधात विरोधकांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बलसूरमध्ये पाच प्रभागांत पंधरा उमेदवारांसाठी निवडणूक होणार होती. या पंधरा जागेसाठी एकूण 43 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 17 नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे आता केवळ 26 उमेदवारांमध्येच लढत असणार आहे. उमेदवारी अर्जावर अनुक्रमांक व प्रभाग क्रमांक चुकीचा देणे, साक्षीदाराची सही न घेणे, अपत्य स्वयंघोषणापत्र नसणे, अशिक्षित असल्याचे शपथपत्र न देणे, ठेकेदारी करत नसल्याचे स्वयंघोषणापत्र नसणे, अशा विविध कारणांमुळे हे 17 अर्ज बाद ठरवण्यात आल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली. अर्ज अवैध ठरवण्यात आलेले हे उमेदवार बब्रुवान चव्हाण व सुरेश मुझे यांच्या गटाचे होते. हे दोन्ही गट रष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांचे विरोधी गट मानले जातात.
उमेदवारांची न्यायालयात धाव
उमेदवारी अर्ज बाद झाल्याने या उमेदवारांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये सुरेखा बब्रुवान चव्हाण, देविदास चव्हाण, सुरेश पंढरीनाथ मुर्टे, अशोक विश्वनाथ साखरे यांच्या नावाचा समावेश आहे, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती या उमेदवारांनी दिली आहे.