ETV Bharat / state

हाथरसची घटना देशातील लोकशाहीला काळिमा फासणारी - छगन भुजबळ

author img

By

Published : Oct 1, 2020, 9:47 PM IST

छगन भुजबळ म्हणाले की, उत्तर प्रदेशात एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जीवे मारून टाकण्याची अमानुष घटना घडली. ही मुलगी मृत्युमुखी पडल्यावर घरी आणून तिच्यावर कुटुंबीयांच्या पद्धतीने अंत्यविधी करण्याची गरज असताना पोलिसांनी कुटुंबीयांना डांबून ठेऊन रातोरात अंत्यविधी केला, हा प्रकार तरी काय आहे? असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

नाशिक
नाशिक

नाशिक - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची अमानुष घटना घडली. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना तिचे अंत्यदर्शनसुद्धा घेऊ न देताच पोलिसांनी रातोरात अंत्यसंस्कार केले. या कुटुंबीयांच्या भेटीसाठी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गेले असताना त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. या दोनही घटना लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणाऱ्या असल्याची टीका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडित महिलेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, उत्तर प्रदेशात एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जीवे मारून टाकण्याची अमानुष घटना घडली. ही मुलगी मृत्युमुखी पडल्यावर घरी आणून तिच्यावर कुटुंबीयांच्या पद्धतीने अंत्यविधी करण्याची गरज असताना पोलिसांनी कुटुंबीयांना डांबून ठेऊन रातोरात अंत्यविधी केला, हा प्रकार तरी काय आहे? असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - हाथरस येथील बलात्कार प्रकरणी कठोर कारवाई करा; मनमाड येथील वंचित बहुजन युवक संघातर्फे निवेदन

ते म्हणाले की, या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गेले असताना पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करण्याची गरज नाही. देशातील एका मोठ्या नेत्याला अशी वागणूक मिळते, याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. तसेच कुठल्याही नेत्याला अशी वागणूक देणे ही बाब निषेधार्ह आहे. इकडे महाराष्ट्रात काहीही कारण नसताना महाराष्ट्र पोलिसांना बदनाम केले जाते आणि उत्तर प्रदेशात नेमकं काय घडतंय? असा प्रश्न उपस्थित करत सगळ्या देशातील जनतेने याचा निषेध करायला हवा असे ते म्हणाले.

हेही वाचा - नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात मुसळधार पाऊस; द्राक्ष बागा संकटात तर सोयाबीनचे नुकसान

ते म्हणाले की, कुठल्याही पीडितेचे अश्रू पुसण्यासाठी शांततेने भेटायला जाणाऱ्या लोकांना अशी वागणूक दिली जाते, हे अत्यंत घृणास्पद आहे. गरिबांवर अत्याचार होत असताना त्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा त्यांना बंदिस्त करून ठेवणे, हे चुकीचे आहे. महात्मा गांधी, गौतम बुद्धांचा हा देश आहे. या भारताला हे अभिप्रेत नाही. या दोनही घटना लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या आहेत. हा निषेध कोण्या एका व्यक्तीच्या विरोधात नाही तर चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात निषेध असून त्यासाठी देशातील जनतेने एकत्र येत निषेध करायला हवा असे त्यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.