ETV Bharat / state

सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं - बाळासाहेब थोरात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 5:22 PM IST

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन द्राक्ष बागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी चांदवड येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शंभर टक्के नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना राज्य सरकारला तातडीनं दिलासा द्यावा लागेल, असं त्यांनी म्हटलंय.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

निफाड (नाशिक) : अवकाळी पावसामुळं द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झाला आहे. निफाड तालुक्यातील कसबे, सुकेणेमध्ये आज माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहणी केली. गारपीटीनं निफाड तालुक्यातील कसबे, सुकेणे इथं द्राक्ष, कांदा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज निफाडमध्ये आले होते. या परिसरत द्राक्ष बागांचं शंभर टक्के नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभे राहणं गरजेचं असल्याचं थोरात यांनी म्हटलंय. विधानसभेच्या अधिवेशनात देखील याबाबत आम्ही चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाची वाट पाहून नये, त्याआगोदर त्यांनी शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहावं असं थोरात यांनी म्हटलंय.

कोट्यवधी रुपयांचं नुकसान : गारपीट, वादळामुळं मोठ्या प्रमाणात कांदा पिकांचं नुकसान झालं आहे. जवळपास वीस ते पंचवीस टक्के लाल कांदा देखील खराब झाला आहे. 500 ते 600 कोटी रुपयांचं कांद्याचं नुकसान झाल्याची माहिती आहे. तसंच तीस हजार एकरावरील द्राक्ष बाग देखील उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत, असून कांदा तसंच द्राक्ष बागेच्या नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पीक विमा योजनेला गती द्या : रविवारी नाशिक जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं या द्राक्षबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यापूर्वी द्राक्ष उत्पादक संघटनेनं शासनाकडं पिकांच्या संरक्षणाची मागणी केली होती. मात्र, सरकारनं त्यांची मागणी केवळ शंभर हेक्टरपर्यंत मर्यादित ठेवली. आता तरी शासनानं प्रायोगिक तत्वावर किमान एक हजार हेक्टर नुसार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसंच नुकसानीची पाहणी करून द्राक्ष उत्पादकांना तत्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासराव भोसले यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. अवकाळीग्रस्तांना लवकरच मदत मिळणार, तातडीनं पंचनाम्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, झोपडपट्टीधारकांसाठीही खुषखबर
  2. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं साडेतीन एकर ज्वारीचं पीक उद्धवस्त ; हातातोंडाशी आलेलं पीक गेलं पाण्याखाली!
  3. नंदुरबारमध्ये वादळी पाऊस! वीज कोसळून तरुणीचा मृत्यू, तर कोट्यवधींची मिरची पाण्यात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.