नंदुरबार - जिल्ह्यात अद्यापही वाळू घाटांचा लिलाव न झाल्याने ठेकेदार गुजरात राज्यातील तापी नदीच्या पात्रातून मोठ्याप्रमाणात वाळू उपसा करत आहेत. या वाळू वाहतुकीमुळे आतापर्यंत वाळूच्या डंपरने धडक दिल्याने जवळपास चार ते पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाळू नाशिक आणि मुंबईकडे पाठवली जात आहे. त्यासाठी मोठ्या आणि अवजड वाहनांचा वापर केला जातो. क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरणे आणि बेजबाबदारीने वाहने चालवणे. हा या वाहतूकदारांचा जणू हक्कच बनला आहे. कोणाच्याही जीवाची पर्वा न करता वाहने चालवून वाहन चालकांनी नाकी नऊ आणले आहेत. या वाहनांमुळे रस्त्यांचीही दुरवस्था झालेली आहे. महिनाभरात रेती वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील वाळू मोठ्या प्रणाणावर नाशिक आणि मुंबईकडे पाठवली जात आहे. त्यासाठी नंदुरबार दोंडाईचा रस्त्यावर तीन आठवड्यापूर्वी पादचाऱ्याला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये त्याच्यासह ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या घटनेत लहान शहादा गावाजवळ डंपरने धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जणांना जायबंदी व्हावे लागले होते. मात्र, पोलीस प्रशासन आणि आरटीओच्या बेजबाबदारपणे वाहन चालवण्यावर दुर्लक्ष होत आल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे. अजून किती अपघात नंदुरबार जिल्ह्यात होतील याची वाट प्रशासन पाहत आहे का? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.