ETV Bharat / state

तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

author img

By

Published : Aug 17, 2020, 3:55 PM IST

पाण्याचा विसर्ग
पाण्याचा विसर्ग

जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे दरवाजे घडल्याने नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीपात्रात पाण्याची वाढ होत आहे. येत्या 72 तासांपर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नंदुरबार - जिल्ह्यात तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील 72 तासांपर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे 36 दरवाजे उघडले असून 91 हजार 267 क्युसेक इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील नदीतील पाणी काही कालावधीत तापी नदीत दाखल होण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचा पाणी विसर्ग अजून वाढणार आहे.

पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकाशा बॅरेजचे 4 दरवाजे 2 मीटर उंचीने उघडण्यात आले असून 25 हजार 61 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर सारंगखेडा बॅरेजचे 4 दरवाजे 2 मीटर उंचीने उघडण्यात आले असून 28 हजार 19 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 72 तासांसाठी नागरिकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुरं-ढोरे नदीकाठी घेऊन जावू नये व नदीकाठी असल्यास सुरक्षितस्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.