ETV Bharat / state

Bawankule On Nana Patole : पंतप्रधानांनी देशासाठी काय केलं; नाना पटोलेंनी माझ्यासोबत करावी खुली चर्चा, बावनकुळेंचं आव्हान

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 11:11 AM IST

Bawankule On Nana Patole
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Bawankule On Nana Patole : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी काय केलं, यावर नाना पटोलेंनी खुली चर्चा करावी, असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.

नागपूर Bawankule On Nana Patole : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केल्यामुळे काँग्रेस नेते संतापले आहेत. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्षलवाद्यांचे पंतप्रधान आहेत का, असा सवाल उपस्थित करत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना डिवचलं होतं. नाना पटोलेंच्या या आरोपांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी काय केलं, या एका विषयावर नाना पटोले यांनी माझ्यासोबत खुली चर्चा करावी, असं आव्हानही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.

काँग्रेसच्या काळात देशात दहशतवादी घटना : स्वातंत्र्यनंतरच्या काळापासूनचा इतिहास बघितला तर काँग्रेसच्या काळातचं देशात दहशतवादी घटना घडण्यास सुरुवात झाल्याचा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. कसाब येऊन मुंबईत बॉम्बस्फोट करू शकला, एवढी हिम्मत शेजारी देशाची झाली होती. मात्र, आज सर्व देशवासीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिमान वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात ज्यांनी देशाविरुद्ध षडयंत्र केलं, त्यांच्या घरात घुसून मारण्याची हिम्मत भारतात आहे, हे दाखवलं असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.

पंकजा मुंडेंच्या रक्तात भाजपा : पंकजा मुंडे या आमच्या नेत्या आहेत. भाजपासाठी त्यांनी काम केलं आहे. भाजपा त्यांच्या मागं आहे, त्या वेगळा निर्णय घेऊ शकत नाहीत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत बोलताना दिली. पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजपा आहे. पंकजा मुंडेंच्या बोलण्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे, त्यांच्या बद्दल अफवा पसरवू नये, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेवटी तपास यंत्रणा चौकशी करतात, त्यानंतर निर्णय घेतात, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

प्रत्येक समाजाला हवं आहे आरक्षण : प्रत्येक समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. ओबीसी आरक्षण जाऊ नये, खरतर आपापल्या समाजाला आरक्षण मिळावं, असं प्रत्येकाला वाटते. सरकार सर्वांच्या पाठीशी आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.

कार्यकर्त्यांना वाटते आपलाचं मुख्यमंत्री व्हावा : राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना वाटते की अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावे. भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देखील तसेच वाटते. काँग्रेसमध्ये 15 नेते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, असा जोरदार हल्लाबोलही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

पूरग्रस्तांना मदत करण्याची तयारी : नागपूर शहरात 24 सप्टेंबरला उद्भवलेल्या भीषण महापूर परिस्थितीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेतली. कितीही प्रगत शहर असेल आणि 2 तासाच्या अल्प कालावधीत जर एवढा पाऊस झाला, तर परिस्थिती सांभाळनं कठीण होते. ज्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना पूर्ण मदत करण्याची सरकारची तयारी असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. Chandrakant Bawankule On Eknath Khadse : कोणी उभं राहीलं तरी रक्षा खडसेंचाच विजयी, एकनाथ खडसेंना भाजपाचं प्रत्युत्तर
  2. Nana Patole News: मंत्रालयात दलालांचा मुक्त वावर पण सामान्य जनतेवर निर्बंध - नाना पटोले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.