मुंबई : नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनानिमित्त भावनिक पत्र लिहिल आहे. बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त आपण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ऐकले. हे वृत्त ऐकताच आपल्या मनात भावनांचा कल्लोळ माजला होता. एका क्षणार्धात बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आपण घालवलेला सर्ववेळ आपल्या डोळ्यासमोरून जात होता, असे या पत्रातून त्यांनी बाळासाहेबांची आठवण काढली आहे. आज सोमवार (दि. 23 जानेवारी)रोजी बाळासाहेबांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे. सर्वच राजकीय पक्ष बाळासाहेबांना अभिवादन करत आहेत.
आठवणी कधीही न संपणाऱ्या आहेत : बाळासाहेब ठाकरे हे कधीही राजकीय व्यक्तिमत्व नव्हते. म्हणूनच ते सर्व क्षेत्रातील लोकांना आपलेसे वाटायचे. त्यांची काम करण्याची पद्धत अत्यंत भिन्न होती. ते पक्के राजकारणी कधीच नव्हते. त्यांनी आयुष्यभर आपल्या कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार केला. म्हणूनच फक्त राज्यातून नाहीतर देशभरातून लोक त्यांच्याकडे आकर्षित होत होते. आपल्या माणसांची बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून नेहमीच काळजी घेतली जात होती. वेळोवेळी आपल्या माणसांची ते विचारपूस करायचे अशी आठवण नारायण राणे यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे. आपल्या बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आपल्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा खूप विश्वास होता. आपल्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत बाळासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आणि विरोधी पक्ष नेतेपद केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आपल्याला मिळाले. आपल्या आतापर्यंतच्या 39 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत बाळासाहेबांनी दिलेले प्रेम आणि आठवणी कधीही न संपणाऱ्या आहेत, याची कबुली पुन्हा एकदा पत्रातून नारायण राणे यांनी दिली आहे.
शेवटच्या क्षणी बाळासाहेबांना भेटता आलेले नाही : बाळासाहेब ठाकरे आपल्या शेवटच्या दिवसांत मृत्यूशी झुंज देत होते. मात्र, यावेळीही ते मृत्यूला चकवा देऊन पुन्हा परत येतील अशी आशा आपल्याला होती. मी घेतलेल्या निर्णयामुळे बाळासाहेब ठाकरे यांना अत्यंत दुःख झाले आणि याची खंत आपल्याला आजन्म राहील. मात्र, त्या वेळेच्या परिस्थितीमुळेच आपल्याला शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला याचा उल्लेख नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या पत्रातून केला आहे. आपण शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही बाळासाहेबांनी आपल्याला दोनदा फोन केला होता. ते आजारी असताना शेवटच्या क्षणी आपल्याला बाळासाहेबांना भेटायचे होते. मात्र, आपल्याला शेवटच्या क्षणी बाळासाहेबांना भेटता आलेले नाही यासाठी बाळासाहेबांनी आपल्याला क्षमा करावी असेही राणे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे नेते : नारायण राणे हे एकेकाळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते होते. शाखाप्रमुख, नगरसेवक, तीन वर्षे बेस्ट समितीचे अध्यक्षपद, मंत्रीपद आणि नंतर थेट मुख्यमंत्रिपद असा राणेंच्या कारकिर्दीचा चढता आलेख राहिलेला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे नेते म्हणून नारायण राणे यांना ओळखले जायचे. मात्र, पुढे उद्धव ठाकरे आणि राणे यांचे फारसे जमले नाही. आणि पुढील काळात राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नारायण राणे आता भाजपमध्ये असून केंद्रीय मंत्री आहेत.
हेही वाचा : शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांबद्दल बाळासाहेबांचे खडे बोल! पाहा व्हिडिओ