ETV Bharat / state

गेल्या 24 तासात मुंबईत दोन जणांना 6 लाखांचा ऑनलाईन गंडा; 'रिमोट अ‌ॅक्सेस सॉफ्टवेअर'चा होतोय वापर

लॉकडाऊन काळात ऑनलाईन व्यवहार वाढल्याने सायबर गुन्हे सुद्धा वाढले आहेत. हे गुन्हे करण्यासाठी गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करत आहेत. सध्या सायबर गुन्हेगार 'रिमोट अ‌ॅक्सेस सॉफ्टवेअर'चा वापर करून नागरिकांना लुटत असल्याचे समोर आले आहे.

Cyber Crime
सायबर क्राईम
author img

By

Published : July 29, 2020 at 3:38 PM IST

Choose ETV Bharat

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात सायबर गुन्ह्यांच्या संख्येत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या २४ तासात मुंबई शहरात दोन जणांना सायबर गुन्हेगारांनी ६ लाख रुपयांना लुटल्याचे समोर आले. मुंबईतील बोरिवली परिसरात राहणाऱ्या अमिता जमेनीस (वय-३८) व प्रफुल बाम (वय-४८) या दोन व्यक्तींना अनुक्रमे ३ लाख व ३ लाख ८ हजार रुपयांना लुबाडण्यात आले.

सायबर तज्ञ रितेश भाटिया यांनी सायबर गुन्ह्यांचे विश्लेषण केले

मुंबईतील बोरिवली परिसरात राहणाऱ्या अमिता जमेनिस यांनी त्यांच्या बँक खात्यातील काही रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर एक अ‌ॅप डाऊनलोड करून घेतले होते. मात्र, त्यांच्या स्वाक्षरीच्या ई व्हेरीफिकेशनसाठी अडचण येत असल्याने त्यांनी संबंधित विभागाच्या कस्टमर केअरला ई मेलच्या माध्यमातून स्वतःची अडचण कळवली. काही वेळातच अमिता यांना मोबाईल अ‌ॅच्या कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याचा एक कॉल आला. फोनवरिल व्यक्तीने अमिता जमेनिस यांना त्यांच्या मोबाईलवर रिमोट अ‌ॅक्सेस सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले. अमिता यांनी रिमोट अ‌ॅक्सेस सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घेतल्यावर त्यांना त्यांच्या बँक खाते व एटीएमच्या संदर्भातील माहिती भरण्यास सांगण्यात आली. पीडित अमिता यांनी सर्व माहिती दिल्यावर त्यांच्या बँक खात्यातून तत्काळ ३ लाख रुपये सायबर भामट्याने गायब केले. हा प्रकार घडल्यानंतर अमिता यांनी लगेचच पोलिसात तक्रार दाखल केली. अमिता यांच्या प्रमाणेच प्रफुल बाम यांचीही फसवणूक करण्यात आली.

काय आहे रिमोट अ‌ॅक्सेस सॉफ्टवेअर?

सायबर तज्ञ रितेश भाटिया यांच्यानुसार लॉकडाऊन काळात ऑनलाईन व्यवहार वाढल्याने सायबर गुन्हे सुद्धा वाढले आहेत. हे गुन्हे करण्यासाठी गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करत आहेत. सध्या सायबर गुन्हेगार पीडित नागरिकांना फोन करून त्यांना त्यांच्या मोबाईलवर रिमोट अ‌ॅक्सेस सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगत आहेत. नागरिकांना फोनकरून ९ अंकांचा व्हेरीफिकेशन कोड मिळवला जातो. या कोडमुळे पीडित व्यक्तीचा मोबाईल हा पूर्णपणे सायबर गुन्हेगारांच्या नियंत्रणात येतो. याद्वारे बँकेच्या संदर्भातील ओटीपी क्रमांक व इतर महत्त्वाचा डेटा मिळवून सायबर गुन्हेगार नागरिकांना लुटत आहेत.