ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष : मुंबईतील वायू प्रदूषणावर मात करण्याची हीच वेळ - हवामान अभ्यासक भगवान केशभट

author img

By

Published : Jul 16, 2020, 11:08 AM IST

'अनलॉक'मध्ये आता पुन्हा कारखाने आणि वाहतूक सुरू झाली आहे. हे पाहता प्रदूषणात झालेली घट आणि चांगल्या हवेची स्थिती कायम ठेवायची असेल तर पर्यावरणीय धोरणात्मक बदल करण्याची हीच अचूक वेळ आहे, असे मत हवामान अभ्यासक भगवान केशभट यांनी व्यक्त केले आहे.

expert bhagwan keshbhat
हवामान अभ्यासक भगवान केशभट

मुंबई - कोरोनाचे महासंकट पाहता केंद्र सरकारने मार्च महिन्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन केले होते. या कालावधीत कारखाने आणि वाहतूक बंद होती. यामुळे हवा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होत आहे. मात्र, 'अनलॉक'मध्ये आता पुन्हा कारखाने आणि वाहतूक सुरू झाली आहे. हे पाहता प्रदूषणात झालेली घट आणि चांगल्या हवेची स्थिती कायम ठेवायची असेल तर पर्यावरणीय धोरणात्मक बदल करण्याची हीच अचूक वेळ आहे, असे मत हवामान अभ्यासक भगवान केशभट यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात त्यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत संवाद साधला.

काही महिन्यांपूर्वी म्हणजे जानेवारी 2020 पर्यंत मुंबई शहरातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले होते. दिल्लीनंतर वायुप्रदूषणात मुंबईचा नंबर लागतो का? अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, मार्च महिन्यानंतर तीन महिने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये वायू प्रदूषण मोठया प्रमाणात घटले. याच कालावधीत मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरातील प्रदूषण कमी होऊन वातावरण शुद्ध झाले आहे. तसेच हवेची गुणवत्ताही सामान्य झाली आहे.

यामुळे अनेक प्राणीदेखील रस्त्यावर दिसले होते. तर वायू प्रदूषणाबरोबर सागरी प्रदूषणदेखील कमी झाले. यामुळे मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्याची ही मोठी संधी आहे. ही स्थिती कायम ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना आताच राबवणे गरजेचे आहे. आता योग्य पाऊले उचलली तर वायू प्रदूषण कमी होऊ शकते, यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती करणार असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या 18 शहरांसाठी जे ऍक्शन प्लॅन तयार केले आहेत ते आता राबिवण्यासाठी एक यंत्रणा राबविणे गरजेचे आहे. या प्लॅनमध्ये ट्रान्सपोर्ट आणि इंडस्ट्रीमुळे होणाऱ्या प्रदूषणासाठी काय केले पाहिजे? हे स्पष्ट केले आहे. युरोपमध्ये सायकल आणि चालणे यावर ‘फोकस’ केला जात आहे. त्याचप्रमाणे मुंबई आणि बाकी शहरामध्ये सायकल ट्रॅक, लोकांना चालण्यासाठी पदपथ उपलब्ध करून द्यायला हवे, असेही ते म्हणाले.

इंडस्ट्रीमधून होणाऱ्या प्रदूषणासाठी एक नियमावली तयार केली तर त्यातून प्रदूषण कमी करण्यासाठी मार्ग काढू शकतो. प्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा आणि शहराच्या आराखडामध्ये देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी कडक पद्धतीने करणे गरजेचे आहे.

मुंबईतील वायू प्रदूषणावर मात करण्याची हीच वेळ...

जास्त प्रदुषित शहरात कोरोनाचा धोका कायम -

ज्या ज्या ठिकाणी प्रदूषण जास्त आहे, त्याठिकाणी कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे. अलीकडे हार्वर्ड विद्यापीठ आणि इटली देशाने केलेल्या अभ्यासात हे सिद्ध झाले की, ज्या ज्या ठिकाणी प्रदूषण आहे त्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव जास्त आहे. याचे कारण असे आहे की, प्रदूषण असणाऱ्या भागात राहणाऱ्या सर्व वयोगटातील लोकांचे फुफ्फुसे कमकुवत झाली आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींना कोरोना झाल्यास तो घातक ठरू शकतो, असे केशभट यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.