ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : शिवसेना फोडल्यानंतर भाजपने लावला राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुरुंग; शिंद्यांची भाकरी करपली डील पक्की...

author img

By

Published : Jul 3, 2023, 10:52 AM IST

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचे महिनाभरापूर्वी विधान केले होते. अजित पवार यांनी नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. ही पक्की डील झाली आहे. शिंदेंची भाकरी यामुळे करपली असून लवकरच शिंद्यांचे राजकारण अजित पवारांच्या चूलीत घालून शेकोटी घेईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसवर आरोपांची राळ उठवणाऱ्या शिंदे गटावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या पदावरही साशंकता निर्माण केल्याने चांगलीच कोंडी झाली आहे.

Maharashtra Political Crisis
शिंद्यांची भाकरी करपली डील पक्की

मुंबई : राज्यात राजकारणाचा खेळखंडोबा सुरु आहे. शिवसेना फोडल्यानंतर भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुरुंग लावला. राजकीय नाट्यावर आरोप - प्रत्यारोपांची राळ उठली आहे. यावर चौफेर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. मोदी - शहा यांच्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणाचा चिखल केला आहे. अजित पवार समर्थक आमदारांसह रविवारी दुपारी राजभवनात शपथविधी घेऊन भाजपच्या दावणीला बांधून घेतले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांच्या सरकारीकरणास काय म्हणायचे असा, सवाल उपस्थित करण्यात आला आहे.



नवी चूल, नवा तवा : पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाऱ्यांवर प्रहार करतात व 24 तासांत भ्रष्टाचारासाठी पायघड्या घालतात. अजित पवार यांनी त्यांच्या काही समर्थकांसह पक्ष सोडला, तो काही फार मोठ्या नैतिकतेच्या विचाराने नक्कीच नाही. शरद पवार यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंद्यांची भाकरी करपली. भाजप आता शिंद्यांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लवकरच मिळेल. तोही औटघटकेचाच ठरेल. शिवरायांच्या राज्यात हे काय चालले आहे? असा सवाल सामनातून विचारला आहे. अजित पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेत्यानेच असं सरकारजमा व्हायचे हे लोकशाहीच्या व नैतिकतेच्या कोणत्या प्रकारात बसते? लोकांची मती गुंग करणारा व राजकीय पुढाऱयांवरचा विश्वास उडवणारा प्रकार महाराष्ट्रात घडवल्याची टीका करण्यात आली आहे.



या वेळी 'डील' पक्के : अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्रात भूकंप वगैरे झाला काय? तर अजिबात नाही. या भूकंपाची चाहूल आधीच लागली होती. त्यामुळे शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे, आजचा दिवस मावळेल. उद्या नवा दिवस उजाडेल हेच खरे. जे शिवसेनेच्या बाबतीत वर्षभरापूर्वी घडले तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे; पण या वेळी 'डील' पक्के आहे. पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी गेले नाहीत. लवकरच घटनेनुसार एकनाथ शिंदे व त्यांच्या फुटीर आमदारांचे विसर्जन होईल व अजित पवारांना सिंहासनावर बसवले जाईल, असे संकेत देण्यात आले आहे.


संपत्ती 'ईडी'ने केली जप्त : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सगळय़ात 'पोपट' झाला आहे. राष्ट्रवादीबरोबर कदापि जाणार नाही. तो भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे, मानेला झटके देत सांगत होते. अजित पवारांवर आरोप केले. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई सुरु होती. त्यांच्या मांडीला मांडी लावून भाजप आणि फडणवीस यांच्या साक्षीने मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रफुल्ल पटेल हेसुद्धा या सोहळ्यास उपस्थित होते. इक्बाल मिर्चाशी व्यवहार केल्याच्या प्रकरणात त्यांची संपत्ती 'ईडी'ने जप्त केली. भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा पुन्हा उघडा पडल्याचे म्हटले आहे.



राजकारणाला पाठिंबा नाही : पंतप्रधान मोदी आणि शहा यांना भ्रष्टाचाराचे वावडे नाही. फक्त तो भाजपात येऊन करा एवढेच त्यांचे म्हणणे आहे. याचा दुसरा अर्थ असाही होतो की, तपास यंत्रणांच्या कारवाया राजकीय दबावाखाली होतात व तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. मध्य प्रदेश, प. बंगाल, महाराष्ट्र, तामीळनाडूत हेच सुरू आहे. महाराष्ट्रात त्यांनी आधी शिवसेना फोडली. आता राष्ट्रवादीवर हात घातला. सत्तेचा हा हपाप आहे. हे नवे सरकार लोकांच्या मनातले नाही. महाराष्ट्राच्या परंपरेला न पचणारे काम सध्या सुरू आहे. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कधीच नव्हती व जनता या असल्या राजकारणाला कधीच पाठिंबा देणार नाही.


अकांडतांडव करणारे आता काय करणार ? शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार हे स्टॅम्पपेपरवर लिहून देऊ काय? असे अजित पवार सांगत होते. तर 'राष्ट्रवादीशी कधीच युती करणार नाही, हे फडणवासी सांगत होते. दोघांनीही पलटी मारली. त्या पलटी मागे मिंधे गटाचा घात आहे. शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून आणखी किती काळ राहतील एवढाच काय तो प्रश्न आहे. अजित पवार व त्यांचे लोक राजभवनात शपथ घेताना शिंदे टोळीचे चेहरे काळे ठिक्कर पडले होते. राष्ट्रवादीमुळे आम्ही शिवसेनेला सोडले. अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते, असे अकांडतांडव करणारे आता काय करणार? अजित पवार फुटीर राष्ट्रवादीसह सरकारात सामील झाले व निधीचे वाटप करणारे अर्थ खातेही त्यांच्याकडेच आले. शिंदे व त्यांच्या आमदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार. ज्यांनी स्वाभिमानासाठी वगैरे बतावण्या करून शिवसेना फोडली त्यांचे नशीबच आता फुटले. त्यांचे नकली हिंदुत्व ही संपले. शिंदे व त्यांच्या आमदारांवर अपात्रतेची तलवार कोसळण्याचा दिवस जवळ आला हाच राजभवनातील रविवारच्या शपथविधीचा खरा अर्थ आहे.



पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाऱ्यांवर प्रहार : महाराष्ट्राचे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन पोहोचले की, सर्व चित्र पाहून मन विषण्ण होते. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि वैभवाला व्यापारी राजकारण्यांची दृष्ट लागली आहे. आम्ही कुणालाही विकत घेऊ शकतो, कोणताही पक्ष फोडू शकतो या अहंकाराने माजलेल्यांच्या हाती लोकशाहीची सूत्र आहेत. मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्यायला हे तयार नाहीत. मुंबईसारख्या शहराला महापौर नाही. नगरसेवक नाहीत. सर्व बाजूंनी फक्त लूट आणि लूटच सुरू आहे. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाऱ्यांवर प्रहार करतात व 24 तासांत भ्रष्टाचाऱ्यांसाठी पायघडय़ा घालतात. काँग्रेसचे व त्याआधीचे ब्रिटिशांचे राज्य यांच्यापेक्षा शंभर पटीने बरे होते. त्यांच्याशी निदान रस्त्यावर उतरून समोरासमोर लढता येत होते. आज जनतेच्या पाठीत रोज वार होत आहेत. अजित पवार यांनी त्यांच्या काही समर्थकांसह पक्ष सोडला, तो काही फार मोठय़ा नैतिकतेच्या विचाराने नक्कीच नाही. शरद पवार यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंदय़ांची भाकरी करपली. भाजप आता शिंदय़ांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लवकरच मिळेल. तोही औटघटकेचा ठरेल. शिवरायांच्या राज्यात हे काय चालले आहे?

हेही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis : शरद पवार पेटवणार रान; उद्या प्रितीसंगमावर जाऊन घेणार दर्शन, मग आखणार रणनीती
  2. NCP political crisis: अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ८ नेत्यांची आमदारकी रद्द करा, राष्ट्रवादीची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी
  3. Maharashtra Political Crisis : अजित पवारांच्या भूमिकेनंतर शरद पवार यांना राहुल गांधींसह देशातील विविध नेत्यांचे फोन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.