ETV Bharat / state

'अनलॉक-४': राज्य सरकरातर्फे आज अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता

author img

By

Published : Aug 31, 2020, 3:44 PM IST

केंद्राच्या ई-पास रद्द करण्याबाबत बंधनकारक सूचनेसह रेस्टॉरंट टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, मेट्रो, रेल्वे, जिम, मंदिर आताच सुरू करण्याबाबत सरकारचा विचार नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

राज्य सरकार
राज्य सरकार

मुंबई - देशात सर्वाधिक कोरोना संसर्गाने ग्रासलेल्या महाराष्ट्रामध्ये गेली दोन दिवस सलग १६ हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या आढळून आली आहे. केंद्राने अनलॉक ४ च्या गाईडलाईन्स जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रातील अनलॉकच्या चौथ्या टप्प्याची अधिसूचना आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

केंद्राच्या ई-पास रद्द करण्याबाबत बंधनकारक सूचनेसह रेस्टॉरंट टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, मेट्रो, रेल्वे, जिम, मंदिर आताच सुरू करण्याबाबत सरकारचा विचार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रशासनाने ई-पास रद्द करण्याबाबत तयारी दाखवली आहे. अजूनही खासगी वाहनांना प्रवास करण्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. ई-पास रद्द करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमातून केली जात आहे. याबाबत राज्याच्या अधिसूचनेमध्ये आज उल्लेख असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्यसरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयात उपस्थिती वाढवण्याची शक्यता आहे. सध्या १५ टक्के असलेली उपस्थिती वाढवून ती ३० टक्क्यावर नेण्याचा विचार आहे.

केंद्राच्या अनलॉक-४ बाबत गाईडलाईन्स, काय सुरू, काय बंद?

कंटेन्मेंट झोनबाहेर लॉकडाऊन नाही. कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन असणार असून ३० सप्टेंबरपर्यंत शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था बंदच राहणार आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी शाळेत ५० टक्के शिक्षक उपस्थित असतील. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावता येणार. २१ सप्टेंबरपासून फक्त १०० जणांच्या सहभागात सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना मंजुरी असणार. सप्टेंबरपासून मेट्रो-रेल्वे टप्प्याटप्प्याने सुरू होणार. मोकळ्या जागांवरील (ओपन एअर) थिएटर २१ सप्टेंबरपासून सुरू करता येणार. सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर्स बंदच राहणार आहे.

तसेच, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही बंदच असणार आहे. २१ सप्टेंबरनंतर लग्न समारंभात ५० ऐवजी १०० वऱ्हाड्यांना उपस्थित राहता येणार आहे. २१ सप्टेंबरनंतर अंत्यसंस्कारासाठी २० ऐवजी १०० जणांना हजर राहता येणार आहे.

‘या’ गोष्टी बंदच राहणार

सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद राहणार आहे. केवळ केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या विमानांनाच उड्डाणाची परवानगी असणार आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर देशातील जनजीवन आणि आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू लॉकडाऊन शिथिल केले जात आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी १ सप्टेंबरपासून देशात अनलॉक ४ सुरू होणार आहे.

शाळा-कॉलेज बंदच

शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपावण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील शाळा-कॉलेज बंद आहेत. १ सप्टेंबरपासून शाळा-कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळू शकते. मात्र, शाळा-कॉलेज सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकारकडे सोपवला आहे.

अनलॉक-३ मधे काय सुरू होते आणि काय बंद होते?

योग संस्था आणि व्यायामशाळा उघडण्यास परवानगी होती. रात्री लागू केलेली संचारबंदी हटवण्यात आली होती. नागरिकांना नियमांचे पालन करून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी होती. ३१ ऑगस्टपर्यंत कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार होती. ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक, मुले आणि गर्भवती महिलांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

हे सर्व बंद होते

शाळा/महाविद्यालये, सिनेमा हॉल, एंटरटेनमेंट पार्क, मेट्रो-रेल्वे बंद होते. तसेच, सामाजिक कार्यक्रमात अधिक नागरिकांच्या सहभागावर निर्बंध होते. धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक किंवा करमणूक संबंधित कार्यक्रमांवर देखील बंदी होती. कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन काटेकोरपणे लागू होते.

हेही वाचा- 'मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.