ETV Bharat / state

SRA Project Mumbai : झोपडपट्टी हस्तांतराबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार; विधानसभेत मुद्दा उपस्थित

author img

By

Published : Jul 21, 2023, 10:02 PM IST

झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर एखादी झोपडी मालकाने विकली तर नव्याने झोपडी घेणाऱ्या मालकाचे नाव परिशिष्ट २ मध्ये समाविष्ठ करण्याबात मुंबईतील बहुसंख्य एसआरए योजनांमध्ये अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण सुटण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबत उच्च स्तरीय बैठक घेण्याची तयारी आज विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात दर्शवली.

file photo
फाईल फोटो

मुंबई - मुंबईतील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना २० ते २५ वर्षे रखडल्या आहेत. या योजनांचे अंतिम परिशिष्ट-२ जाहीर करण्याची विस्तृत प्रक्रिया शासन निर्णय १६ मे २०१५ मध्ये देण्यात आलेली आहे. अंतिम परिशिष्ट-२ जाहीर होण्यापूर्वीच्या विहित कालावधीतील झोपडयांची हस्तांतरणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन झालेली असल्यास रक्कम ४० हजार (निवासी झोपडीसाठी) व रक्कम ६० हजार (अनिवासी झोपडीसाठी) इतके हस्तांतरण शुल्क झोपडीधारकाकडून स्विकारुन, अशा झोपडीधारकांना पात्र ठरविण्यात येते.

काय आहे प्रकरण - परिशिष्ट-२ जाहीर झाल्यानंतर झालेली हस्तांतरणे मान्य करण्याची कोणतीही तरतूद प्रचलित शासन निर्णयामध्ये नाही. परिशिष्ट-२ जाहीर झाल्यानंतर, एखाद्या झोपडीधारकाचा मृत्यु झालेला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या वारसांना सदनिका वितरित होण्यासाठी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत त्यांना वारसपत्र (वारस प्रमाणपत्र देण्यात येते. त्याकरिता संबंधित वारसांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे रितसर अर्ज सादर करावा लागतो. सक्षम प्राधिकाऱ्यांकडून अंतिम परिशिष्ट-२ जाहीर झाल्यानंतर हस्तांतरणे मान्य करता येत नाहीत. अंतिम परिशिष्ट-२ हे सर्व हरकती व सूचना विचारात घेऊन अंतिमरित्या जाहीर करण्यात आलेले असते. त्यामध्ये कोणताही बदल करण्याची अधिकारीता सक्षम प्राधिकारी यांना नाही. त्यामुळे मुंबईतील अनेक योजनामध्ये मोठा तिढा निर्माण झाला आहे.

आशिष शेलार यांची मागणी - अनेक योजना २० ते २५ वर्षे रखडल्या. त्यामुळे काही जणांनी कौंटुंबिक कारणास्तव घरे विकली पण ती नावावर होत नाहीत. त्यामुळे योजनामध्ये तिढा ‍निर्माण होतो व योजना रखडतात. याकडे लक्ष वेधत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यांनी आपल्या निवेदनात वांद्रे पश्चिम विधानसभेतील साई श्रध्दा गृहनिर्माण संस्थेचे पुर्नविकासाचे काम २००६ पासून रखडले आहे, तर जाफरबाबा गृहनिर्माण संस्थेचे काम १९९८ पासून खडले आहे, महाराष्ट्र नगर गृहनिर्माण संस्था २००७, गझरबांध २००७, रत्नप्रभा गृहनिर्माण संस्था २००६, रत्नप्रभा १९९८, प्रभात दर्शन २००५, मद्रासवाला गृहनिर्माण संस्था २००७ , बेहराम सुधार कमिटीचे १९९७ अशी उदहारणे देत या योजना २० ते २५ वर्षे रखडलेल्या योजनांची यादीच वाचून दाखवून मुंबईतील योजनांचे चित्रच उभे केले. जर परिशिष्ट-२ होण्याआधील घर विकता येते. तसेच योजना पूर्ण झाल्यानंतर घर विकता येते. मग दरम्यानच्या काळात का नाही असा सवाल करीत योजना रखडली. त्यामध्ये झोपडापट्टीधारकांचा काय दोष? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे या नियमात बदल करावा, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी सरकारकडे केली.

परिशिष्ट-२ होण्याआधील घर विकता येते. तसेच योजना पूर्ण झाल्यानंतर घर विकता येते. मग दरम्यानच्या काळात का नाही? यात झोपडापट्टीधारकांचा काय दोष? या नियमात बदल करण्याची गरज - आशिष शेलार, आमदार, भाजप

याबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक अधिवेशन काळात घेऊन आपण चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू - अतुल सावे, गृहनिर्माण मंत्री

गृहनिर्माण मंत्र्यांचे उत्तर - याबाबत उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन याबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक अधिवेशन काळात घेऊन आपण चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मुंबईतील झोपडपट्टीधारकांचा मोठा तिढा सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा -

  1. Mumbai News: मुंबईतील झोपडपट्ट्या होणार चकाचक, शाळांमध्येही व्यायाम शाळा
  2. Dharavi Slum Redevelopment : पुनर्विकासाला पुन्हा ब्रेक, धारावी झोपडपट्टी प्रकल्पाला न्यायालयात आव्हान
  3. Mumbai News : झोपडपट्टी वासियांची उच्च न्यायालयाने घेतली दखल; इमारतीमधील समस्यांसाठी नोडल ऑफिसर नियुक्त करा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.