ETV Bharat / state

१० जानेवारीच्या निर्णयाकडं सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष, तर उद्धव ठाकरे गटाला निकालाकडून अपेक्षा धूसर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 3:44 PM IST

Shiv Sena MlA Disqualification Case
आमदार अपात्र प्रकरण

Shiv Sena MlA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार याकडं राज्यासोबतच देशाचं लक्ष लागलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे या प्रकरणी येत्या १० जानेवारीला निकाल सुनवणार आहेत.

मुंबई Shiv Sena MlA Disqualification Case : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी करत राज्यात भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबत सुरू असलेल्या सुनावणीचा निकाल येत्या १० जानेवारीला येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हा निकाल सुनावणार असून दोन्ही बाजूच्या वकीलांसमोर हा निकाल सुनावला जाणार आहे. या निकालाकडं राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या आमदारांना निकाल आपल्याच बाजूनं लागेल अशी अपेक्षा आहे. तर दुसरीकडं आमदार अपात्र प्रकरणी झालेल्या सुनावणीच्या संपूर्ण घटनाक्रमाकडं पाहिलं असता उद्धव ठाकरे गटाला त्यांच्याबाजूनं निकाल लागेल ही अपेक्षा फार कमी आहे. निकाल विरोधात गेल्यास उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.



निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार : शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी काहीच दिवसांपूर्वी पूर्ण झाली असून या प्रकरणाचा निकाल येत्या १० जानेवारीला येण्याची शक्यता जास्त आहे. निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दोन्ही गटांच्या वकिलांना समोरा-समोर बोलावून हा निकाल घोषित करणार आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, यापैकी नेमका कुणाला दिलासा मिळणार? याकडं संपूर्ण राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. अशात शिंदे गटाच्या अनेक आमदारांच्या मते सध्या विधिमंडळातील बहुतमताच्या आधारे निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह हे शिंदे गटाला दिलं होतं. त्याच पद्धतीनं आता विधानसभा अध्यक्ष देखील निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेत आपला निर्णय देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नार्वेकरांकडून फार अपेक्षा नाही : या निकालाबाबत बोलताना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, महाभारतामध्ये पांडवांची संख्या कमी होती तर कौरवांची संख्या जास्त होती. शकुनी मामाचे फासे जोपर्यंत कुटनीतीने कौरवांच्या बाजूने पडत होते, तोपर्यंत कौरव जिंकत होते. परंतु प्रत्यक्षात कुरुक्षेत्रावर लढाई सुरू झाली तेव्हा संख्येने कमी असलेले पांडव जिंकले. कारण तेव्हा शकुनीचे फासे चालत नव्हते तिथे ध्येय आणि शौर्याची परीक्षा होती. आताचा काळ जर बघितला तर ईडी, सीबीआय किंवा विधानसभा अध्यक्षपद हे सर्व शकुनीचे कुटनीतीने फासे टाकणारे लोक आहेत. त्यामुळं असे फासे टाकताना काय परिणाम होणार आहे, याची आम्हाला चांगली कल्पना आहे. त्यामुळं आम्ही नार्वेकरांकडून फार अपेक्षा ठेवली नाही. किंबहुना आम्हाला बिलकुलच अपेक्षा नाही.

महाराष्ट्रातील जनता ही हतबल दामिनी : निवडणुकीच्या कुरुक्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा उतरू तेव्हा ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशनचे फासे चालणार नाहीत. तेव्हा उद्धव ठाकरे यांचं धैर्य तसेच तमाम शिवसैनिकांचे शौर्य हे कामाला येणार आहे. त्या रणनितीमध्ये निवडणुकीच्या कुरुक्षेत्रामध्ये ज्यांना तुम्ही शिल्लक सेना म्हणून हिणवत आहात ती शिवसेना तुम्हाला जिंकलेली दिसेल. जर या प्रकरणांमध्ये नार्वेकर यांना न्याय करायचा असता तर सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर सुद्धा त्यांनी हे प्रकरण टोलवत ठेवलं नसतं. न्यायाला ज्या पद्धतीने त्यांनी उशीर केला आहे. तो एका अर्थी अन्याय करण्यासारखाच आहे. सरकारचं शेवटचं अधिवेशन सुद्धा त्यांनी काढून घेतलं. त्यामुळं आता पात्र झाले किंवा अपात्र झाले, तरी काही फरक पडत नाही. कारण २२ जानेवारी राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आचारसंहितेचा खेळ सुरू होणार आहे. त्यांनी अपात्र केलं तरी काही फरक पडणार नाही कारण त्यांनी त्यांची टर्म पूर्ण काढली आहे. नार्वेकर हे दामिनी चित्रपटातील चड्डा असून महाराष्ट्रातील जनता ही हतबल दामिनी आहे. जी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केलीय.


कायद्याचा अभ्यास करूनच उठाव : आमदार अपात्र प्रकरणी शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तरीसुद्धा एकनाथ शिंदे हे विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात. तसंच ते मुख्यमंत्रीपदी कायम राहतील असं वक्तव्य यापूर्वीच भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. तर दुसरीकडं काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी एकांतात भेट घेऊन चर्चा केली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दोन दिवसांवर घोषित करायचा असताना निकाल देणारेच न्यायमूर्ती जर मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतील तर त्याचा काय अर्थ होतो? अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय.

सुषमा अंधारेंना लगावला टोला : या सर्व घडामोडीवर बोलताना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं की, ज्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उठाव केला, तेव्हा न्यायाची संपूर्ण पडताळणी करूनच हा उठाव केला गेला होता. म्हणून आम्हाला न्याय मिळण्याची पूर्ण शाश्वती असून खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. उद्धव ठाकरे हे पूर्णतः निष्क्रिय असून आता कुठे ते घरातून बाहेर पडू लागले आहेत. त्यांच्या उपनेत्या कायद्यावर आणि महाभारतावर बोलत असल्या तरी आम्ही प्रत्यक्षात कायद्यात काम करत असून त्यांना विधानसभा अध्यक्षांवर बोलण्याचा काही एक अधिकार नाही, असा टोलाही वाघमारे यांनी सुषमा अंधारेंना लगावला आहे. त्याचबरोबर काम करणाऱ्या लोकांनाच महाराष्ट्रातील जनता खुर्चीवर बसवते. म्हणून आता दिल्ली जास्त दूर नसून फक्त पाच - सहा महिन्याच्या अवधीतच सर्व चित्र स्पष्ट होईल आणि 'दूध का दूध पाणी का पाणी' होईल.


इतिहासातील ऐतिहासिक निवाडा : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा हा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ञांकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना येत्या १० जानेवारीपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले असताना, त्या अनुषंगाने नार्वेकर यांनी तयारी सुरू केली आहे. त्याचप्रमाणं कदाचित १० जानेवारीपर्यंत राहुल नार्वेकर हे वाट पाहणार नसून आज किंवा उद्याही ते निकाल जाहीर करू शकतात, अशी शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. वास्तविक देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांना याबाबत निर्णय घ्यायचा आहे. ज्या दरम्यान शिवसेनेत फूट पडली त्याप्रसंगी राजकीय पक्ष कोणाचा होता?. जर त्या दिवशी राजकीय पक्ष हा एकनाथ शिंदेचा होता, तर मग राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष अशी जी विभागणी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात केली आहे. याचा नेमका अर्थ काय होतो?, याचा संपूर्ण सारासार विचार करून हा देशाचा इतिहासातील ऐतिहासिक निवाडा असणार आहे.

हेही वाचा -

  1. 'राहुल नार्वेकरांना आदेश देण्याचे सुप्रीम कोर्टाला अधिकारच नाहीत'
  2. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; अपात्रतेच्या निकालाआधीच मोठी खलबतं?
  3. शिवसेना आमदार अपात्र प्रकरण; निर्णय घेण्यासाठी राहुल नार्वेकरांना मुदतवाढ, वाचा नवीन तारीख काय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.