ETV Bharat / state

Aryan Khan drugs case: आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांची पुन्हा चौकशी?

author img

By

Published : Oct 20, 2022, 1:00 PM IST

Aryan Khan drugs case
Aryan Khan drugs case

आर्यन खानच्या (Aryan Khan) कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cordelia cruise drugs) प्रकरणाचा तपास करणारे मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखडे (sameer wankhede) यांनी या प्रकरणात योग्य तपास केला नसल्याचा ठपका दिल्ली एसआयटी एनसीबीच्या (delhi SIT NCB) अधिकाऱ्यांनी ठेवला आहे.

मुंबई: आर्यन खानच्या (Aryan Khan) कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cordelia cruise drugs) प्रकरणाचा तपास करणारे मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखडे (sameer wankhede) यांनी या प्रकरणात योग्य तपास केला नसल्याचा ठपका दिल्ली एनसीबीच्या (delhi NCB) अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. आता त्यानंतर पुन्हा एकदा समीर वानखेडे यांची विभागीय चौकशी सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दिल्ली एनसीबीने ठेवला ठपका: कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या चौकशी वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या प्रकरणातील साक्षीदार असलेले प्रभाकर साईल यांनी देखील समीर वानखेडे यांनी आर्यन खान यांना सोडण्याकरिता 25 लाख रुपयाची मागणी केली असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. यानंतर दिल्ली एनसीबीने एसआयटी गठीत करून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याच समितीच्या अहवालाद्वारे समीर वानखडे यांच्यावर योग्य तपास न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. समीर वानखेडे यांनी केलेल्या तपासामध्ये अनियमितता आढळून आली असून, याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण? : गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या काॅर्डिलिया क्रूझवर समीर वानखेडे यांच्या पथकाने छापेमारी केली होती. या प्रकरणात अभिनेता आर्यन खान, अरबाज मर्चंटसह सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर माजी मंत्री नवाब मलिक यांच्या पाठोपाठ एनसीबी पंचांनीही पैशांच्या मागणीचे गंभीर आरोप एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर केले होते. आर्यनला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी झाल्याचाही आरोप करण्यात आला होता. याची दखल घेत एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना केली. याच काळात वानखेडे यांची बदलीही करण्यात आली. एनसीबी दक्षता समितीच्या पथकाने समीर वानखेडे यांचीही चौकशी केली होती. या चौकशीचा अहवाल तीन महिन्यांपूर्वी एनसीबीच्या महासंचालकांना सादर करण्यात आला. दरम्यान, पंच प्रभाकर साईलचाही मृत्यू झाला. या पैशांच्या व्यवहाराच्या दिशेने एनसीबीचे विशेष पथक अधिक तपास करीत आहे. त्यामुळे या अहवालातून काय समोर येते याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

तीन हजार पानांचा चौकशी अहवाल: एनसीबीच्या दक्षता पथकाकडून तीन हजार पानांचा चौकशी अहवाल महासंचालकांकडे सादर केला गेला आहे. यामध्ये क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास योग्य झाला नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामात अनियमितता आढळून आली आहे. या प्रकरणात 65 जणांचे चार वेळा जबाब नोंदविण्यात आले आहेत मात्र त्यांच्या जबाबातही तफावत आढळून आली आहे. तसेच, काही अधिकाऱ्यांची भूमिकाही दोन गुन्ह्यांत संशयास्पद आढळून आली असल्याचेही नमूद आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.