मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे गेल्या 4 महिन्यांपासून धार्मिक स्थळ असलेली मंदिरही बंद आहेत. मंदिर सुरू करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय न घेतल्याने त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज(सोमवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. मॉल उघडले तर मंदिर का नाही, याबाबत पाठपुराव्याकरता मला एक दोन दिवसांची वेळ द्या, असे म्हणत राज ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवितानाच काही प्रश्नही यावेळी उपस्थित केले.
श्रावण सुरू असल्यामुळे किमान स्थानिकांना प्रवेश देऊन राज्यातील मंदिरे सुरू करावीत अशी मागणी पुजाऱ्यांनी राज ठाकरेंकडे केली. यावेळी राज ठाकरेंनी कशाप्रकारे तुम्ही मंदिरे सुरू करणार, याची नियमावली आखा. मंदिरात झुंबड झाली तर काय करणार, याची नियमावली तयार करा, ही नियमावली राज्य सरकारकडे सुपूर्द करू, अशा सूचना त्यांनी पुजाऱ्यांना दिल्या. मंदिरे खुली केली जावीत असे आपलेही मत आहे. पण इतर धर्मीयांचे काय, ते सर्व नियम पाळतील का, अशी शंकाही राज यांनी बैठकीत उपस्थित केली.
नियमावली आली तर ती सर्वांसाठी असेल. मंदिरे उघडलीच पाहिजेत अशी मनसेची भूमिका आहे. पण लोकांची झुंबड आली तर ती कशी नियंत्रणात आणणार हा प्रश्न आहे. मंदिरे खुली झाली आणि गर्दी झाली तर नियोजन कसं करणार. धार्मिक स्थळं उघडली तर ती फक्त मंदिरासाठी नसेल तर इतर धार्मिक स्थळांसाठीही असेल. आपण नियम पाळले पण इतरांनी नाही पाळले तर काय करणार, राज्य सरकारने याबाबत नियमावली तयार करायला हवी अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडली. मंदिर खुली करण्याबाबतचा प्रश्न त्र्यंबकेश्वरपुरता मर्यादित नाही तर सर्वच मंदिरासाठी आहे. त्यामुळे पुढील नियोजन, नियमावली तयार करावी असं या बैठकीत ठरल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले.