ETV Bharat / state

Monsoon Session : राज्यात कलंकीत सरकारचा बोगस कारभार; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

author img

By

Published : Jul 16, 2023, 6:21 PM IST

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. राज्यात कलंकीत सरकारचा बोगस कारभार सरू आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्यावर सर्वपक्षीय विरोधकांनी बहिष्कार टाकल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दिली.

Monsoon Session
Monsoon Session

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवलेले सरकार राज्यात सत्तेवर आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. युवक, शेतकरी आदी हवालदिल आहेत. अशा कलंकित सरकारचा चहा सुध्दा घ्यावा, अशी भावना विरोधकांच्या मनात नाही. सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्यावर यामुळे सर्वपक्षीय विरोधकांनी बहिष्कार टाकल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संख्याबळ कमी असले, तरी सरकारला धारेवर धरू असा इशारा त्यांनी दिला. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यावेळी उपस्थित होते.

राज्यात कलंकित सरकार : विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सत्तेतील सरकार घटनाबाह्य ठरवले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना देखील गटनेता पदावरून हटवले आहे. राज्यात एकंदरीत कलंकित सरकार आहे. त्यामुळे सरकारकडून आलेले चहापानाचे निमंत्रण आम्ही नाकारले आहे. राज्यात शेतकरी, युवक, आदी घटक त्रस्त आहेत. महागाई, बेरोजगारीने कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. अतिवृष्टीचा निधी, राज्य शासनाने अनुदान अद्याप दिलेले नाही. एकीकडे मोठ्या घोषणा करायच्या, दुसरीकडे त्याची अंमलबजावणी होत नाही. एनडीआरएफचे निकष डावलून शेतकऱ्यांंना मदत देऊ, अशी ग्वाही सरकराने दिली होती, असे दानवे म्हणाले.


उद्योगधंदे गुजरातला : शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. नागपूरमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे. जातीय दंगली घडवल्या जात आहेत. सरकारचा यामागे हात असल्याचा संशय आहे. अनेक विभागात मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरु आहेत. बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार सुरु असल्याचा आरोप दानवेंनी केला. मंत्र्यांचे अनेक घोटाळे उघडकीस आले आहेत. मंत्री अब्दुल सत्तार विरोधात मोठे आरोप आहेत. मंत्र्याचे स्वीय सचिव यात गुंतले आहेत. सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी याला दुजोरा दिला आहे. तपास यंत्रणा लावून पक्ष फोडले जात आहेत. उद्योगधंदे गुजरातला गेले जात आहेत. समृध्दी महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. हा मार्ग जनतेचा जीव घेण्यासाठी बनवला की काय, असा प्रश्नही दानवेंनी विचारला.



सत्ताधाऱ्यांना पाणी पाजू : खारघर येथे धर्माधिकारी यांना दिलेल्या पुरस्कार कार्यक्रमात अनेकांचा जीव गेला. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी सरकारने समिती नेमली. अद्याप त्यावर कारवाई झाली नाही. मृत्युला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी उलट समितीला मुदतवाढ देऊन सरकारने वेळकाढू पणा केला आहे. कलंकित सरकारचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांनी चहापानावर बहिष्कार टाकला आहे, असे दानवेंनी सांगितले. तसेच राज्यात विरोधी पक्ष कमकुवत झाल्याच्या प्रश्नांवर औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूठभर मावळ्यांनी पाणी पाजले होते. महाराष्ट्राचा हा इतिहास आहे. त्याच पध्दतीने सत्ताधाऱ्यांना पाणी पाजू. आम्हाला गृहीत धरुन कमी समजू नका, असा इशारा दानवेंनी दिला.


फोडाफोडीच्या राजकारणात विकास मागे - खडसे : राज्यात विकासाच्या नावाने सत्ताधारी गळे काढत आहेत. विकास आहे कुठे, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसेचे विधान परिषदेचे गटनेते एकनाथ खडसे यांनी विचारला. तसेच सरकार आपल्या दारी, सांगून जनतेची फसवणूक सुरु आहे. शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची दिवसागणिक लूटमार होत असल्याचा आरोप खडसेंनी केला. सत्तेतील भाजपला फोडाफोडीच्या राजकारणात स्वारस्य आहे. जनतेचे काही घेणे देणे नाही. विकास त्यामुळे मागे राहिल्याचा खोचक टोला खडसेंनी लगावला.

गृहखाते उदासिन - थोरात : मान्सूनमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. दुबार पेरणी करावी लागण्याची स्थिती आहे. शासन मदतीच्या मोठ्या घोषणा करते. त्यांची मदत शेतकऱ्यांना मिळत नाही. तळागाळातील शेतकरी यामुळे हवालदिल झाला असून अनेकांनी आत्महत्या केल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. गुन्हेगारीचा आलेख विस्तारतो आहे. गृहखाते त्यापुढे उदासीन आहे. अंमली पदार्थ विक्रीचे प्रकार वाढले आहेत. महिला - मुुली गायब होत आहेत. जवळपास पाच हजार मुली बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात घडला आहे. गृहखात्याने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सरकार भ्रष्ट्राचारात गुंतले असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. तसेच मंत्रालयातून गुन्हेगारीला पाठबळ दिले जात असल्याच्या खासदार संजय राऊतांच्या आरोपाला त्यांनी दुजोरा देत, सरकारवर टीकास्त्र सोडले.




हेही वाचा - Devendra Fadnavis : अजित पवार-शरद पवार भेट; देवेंद्र फडणवीस म्हणाले, No Big Deal

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.