Mumbai University Convocation 2021 : विद्यापीठाची ख्याती जगभर व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील राहावे - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

author img

By

Published : Dec 28, 2021, 3:07 AM IST

Mumbai University Convocation 2021

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान असणाऱ्या मुंबई विद्यापीठाची ख्याती जगभर व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाने सतत प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. ( Bhagat Singh Koshyari in Mumbai University Covovcation 2021 )

मुंबई - देशातील अग्रगण्य म्हणून समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा ( University of Mumbai ) गौरवशाली इतिहास आहे. अलीकडेच विद्यापीठाला 'नॅक'कडून ए प्लस प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान असणाऱ्या मुंबई विद्यापीठाची ख्याती जगभर व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाने सतत प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. ( Bhagat Singh Koshyari in Mumbai University Covovcation 2021 )

आत्मनिर्भर व्हावे लागेल- राज्यपाल

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचा २०२१ या वर्षाचा वार्षिक दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, गोव्याचा राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेचे संचालक प्रा. सुनील कुमार सिंह उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी डोळ्यांसमोर मोठे लक्ष्य ठेवून त्याच्या यश प्राप्तीसाठी परिश्रम करून विलक्षण असे काही प्राप्त केले तर भारताला जगद्गुरू होता येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरीच्या संधी निर्माण करणारे उद्योजक व्हावे असे राज्यपालांनी सांगितले. देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रत्येक स्नातकाला आत्मनिर्भर व्हावे लागेल. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आंतरशाखीय अध्ययन व अकॅडेमिक क्रेडिट्स देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विविध शाखांमधील विषय देखील शिकता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जीवघेण्या स्पर्धेला बळी पडू नका - प्रा. सुनील कुमार सिंह

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेचे संचालक प्रा. सुनील कुमार सिंह म्हणाले की, शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणामुळे सर्वांगीण विकास तर होतोच. मात्र, त्याबरोबर मिळणारा आनंद हा आयुष्यभराची संपत्ती म्हणूनही सोबत असतो. शिक्षण या प्रक्रीयेत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांची भूमिका मोलाची असते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, या जगात वावरतांना जीवघेण्या स्पर्धेला बळी पडू नका. जे मनापासून आवडते त्यावर अधिक भर देऊन आणि स्वतःवर विश्वास ठेऊन मार्गक्रमण करा, असा सल्ला त्यांनी याप्रसंगी दिला.

हेही वाचा - Omicron Patients in Mumbai : मुंबईत ओमायक्रॉन विषाणूचे ११ नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा ८५वर

दोन लाखांपेक्षा जास्त पदव्या प्रदान -

या वर्षीच्या दीक्षांत समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण २ लाख १२ हजार ५७९ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये १ लाख ९ हजार १७३ मुले तर १ लाख ३ हजार ४०६ मुलींचा समावेश आहे. पदवीसाठी १ लाख ७९ हजार ७०६ तर पदव्युत्तरसाठी ३२ हजार ८७३ विद्यार्थ्यांना पदव्यांचा समावेश आहे. तसेच मुलींमध्ये पदवी स्नातकांची संख्या ८३ हजार १५८ आणि पदव्यूत्तर स्नातकांसाठी २० हजार २४८ एवढी आहे. मुलांमध्ये पदवी स्नातकांची संख्या ९६ हजार ५४८ आणि पदव्यूत्तर स्नातकांसाठी १२ हजार ६२५ एवढी आहे. विद्याशाखानिहाय आकडेवारी लक्षात घेता यावर्षीच्या दीक्षांत समारंभामध्ये मानव्यविज्ञान शाखेसाठी २५ हजार ५९३, आंतरविद्याशाखेसाठी १० हजार ९८, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी १ लाख १७ हजार ८३२ तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी ५९ हजार ५६ पदव्यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.