मुंबई - शहरातील कचरा देवनारच्या 'डम्पिंग ग्राउंड'वर टाकला जातो. या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याबाबतच्या प्रस्तावात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेनेने केला होता. आज दोन वर्षांनी हा प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला असता. विरोधकांना बोलू न देता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
प्रदूषण टाळण्यासाठी निर्णय -
मुंबईत रोज सुमारे ५ हजार मॅट्रिक टन कचरा गोळा होतो. या कचऱ्याची याच ठिकाणी विल्हेवाट लावली जाते. कचऱ्याची विल्हेवाट लावताना प्रदूषण होऊन त्याचा नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार आहे. कचरा आणि प्रदूषण कमी व्हावा म्हणून पालिकेने कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. एक हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असून २५ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.
२०१८ मध्येच प्रस्ताव -
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव २०१८ मध्ये स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. परंतू त्या प्रस्तावात भ्रष्टाचार असल्याचे कारण देत शिवसेनेने देवनार डम्पिंग ग्राऊंडवर वीजनिर्मितीच्या प्रस्तावाला विरोध केला होता. आज दोन वर्षांनी हा प्रस्ताव स्थायी समितीत पुन्हा एकदा मंजुरीसाठी आला असता शिवसेनेने कोणत्याही प्रकारचा विरोध न करता मंजुरी दिली.
प्रस्ताव मंजुरीबाबत स्पष्टीकरण -
दोन वर्षांपूर्वी याच प्रस्तावात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. आज दोन वर्षानी विरोधकांचा विरोध न जुमानता शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केला. पालिका प्रशासनाने या प्रस्तावाबाबत स्पष्टीकरण दिले, ते योग्य वाटल्याने प्रस्ताव मंजूर केल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.