ETV Bharat / state

मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार; धरणांमध्ये कमी पाणीसाठा

author img

By

Published : Jul 24, 2020, 10:16 AM IST

water
मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे धरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 40 टक्के पाणीसाठा कमी आहे. पावसाचे प्रमाण न वाढल्यास मुंबईतील नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागेल. पाणी कपातीचा प्रस्ताव आल्यास योग्य निर्णय घेऊ,असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

मुंबई- शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या पावसाचे प्रमाण कमी आहे. पावसाळ्यातील दोन महिने संपत आले असताना मागील वर्षांपेक्षा धरणामध्ये ४० टक्के पाणीसाठा कमी आहे. मुंबई आणि मुंबई परिसरात पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाचे अद्यापही दोन महिने बाकी आहेत. यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये वर्षभरासाठी लागणारा पाणीसाठा जमा झाला नाही तर मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार येणार आहे. पाणी कपातीचा प्रस्ताव आल्यास त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

मुंबईला तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडकसागर, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला रोज 3750 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्याप्रमाणे वर्षभरासाठी 14 लाख दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा धरणामध्ये जमा असावा लागतो. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस पडला नसल्याने 4 लाख19 हजार 318 दशलक्ष लिटर इतकाच पाणी साठा जमा आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना तीन ते साडेतीन महिने पुरेल इतकाच आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या 419318 दशलक्ष लिटर इतका पाणी साठा आहे. मागीलवर्षी याच वेळी 2019 ला हा पाणीसाठा 785088 दशलक्ष लिटर एवढा होता. मागील वर्षापेक्षा यावर्षी 40 टक्के पाणीसाठा कमी आहे. त्याआधी 2018 ला या दिवशीचा पाणीसाठा 1180341 दशलक्ष लिटर एवढा होता. धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी दरवर्षीपेक्षा कमी आहे.

अद्याप प्रशासनाने पाणीकपातीचा कोणताही प्रस्ताव आणला नसला तरी सध्याची पाणीसाठ्याची स्थिती पहाता असा प्रस्ताव येत्या काळात आणला जाऊ शकतो. त्यामुळे यंदा मुंबईकरांना कोरोनासोबतच पाणीकपातीच्या संकटालाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता पाणी कपातीचा अद्याप कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. प्रस्ताव स्थायी समिती आणि पालिका सभागृहात आल्यास त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाची सध्याची पाणी पातळी

अप्पर वैतरणा - 20586 दशलक्ष लिटर

मोडक सागर - 48223 दशलक्ष लिटर

तानसा - 34839 दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा - 55085 दशलक्ष लिटर

भातसा - 235791 दशलक्ष लिटर

विहार - 16846 दशलक्ष लिटर

तुलसी - 7949 दशलक्ष लिटर

एकूण 419318 दशलक्ष लिटर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.