ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : 'या' आमदारांवर आहे, कारवाईची टांगती तलवार

author img

By

Published : May 10, 2023, 8:18 PM IST

Updated : May 11, 2023, 7:35 AM IST

Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis

महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ गुरुवारी निकाल देण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या 16 आमदारांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. उद्याचा निकाल काय लागणार याकडे सर्व देशासह राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तरी कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे जाणून सविस्तर

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा उद्या निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात धाकधूक वाढली आहेत. निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे हे जाणून घेऊया...

Maharashtra Political Crisis
आमदारांवर कारवाईची टांगती तलवार कायम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपरी - पाचपाखडी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. 2004 पासून सलग चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रभावाने 1980 च्या दशकात ते राजकारणात आले. सार्वजनिक बांधकाम, नगरविकास मंत्री आणि सध्या राज्याचे 20 वे मुख्यमंत्री आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेतील 40 आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सरकार उलथवून लावत, भाजपच्या पाठिंब्यावर स्वतः मुख्यमंत्री झाले. सध्या शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आहेत.

Maharashtra Political Crisis
आमदारांवर कारवाईची टांगती तलवार कायम

अब्दुल सत्तार : सिल्लोड विधानसभा मतदार संघाचे अब्दुल सत्तार विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार मध्ये कृषी मंत्री कार्यरत आहेत. सत्तार यांच्या राजकीय कारकिर्दीला १९८४ ला सुरुवात झाली. यापूर्वी कॉंग्रेसमध्ये ते मंत्री राहिलेले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्तार राज्यमंत्री होते. एकनाथ शिंदेंच्या बंडात भाग घेतल्यानंतर त्यांच्यावर कृषीमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. सिल्लोडचे नगराध्यक्षपदापासून सलग तीन वेळा आमदा म्हणून निवडून आले आहेत. राज्यात शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून त्यांची कारकिर्द वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे.

Maharashtra Political Crisis
आमदारांवर कारवाईची टांगती तलवार कायम

संदीपान भुमरे : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याचे मंत्री संदीपान भुमरे आमदार आहेत. सलग पाच वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. 1988 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कट्टर शिवसैनिक असलेल्या भुमरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीत सामील झाल्याने टीकेचा सामना करावा लागला होता. सध्या रोहयो आणि फलसंवर्धन मंत्री म्हणून कार्यरत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर भुमरेंवर जोरदार टीका झाली. दरम्यान, चांगले व्हिडीओ पोस्ट व्हायरल कर, असे कार्यकर्त्याला त्यांनी केलेले आवाहन चांगलेच व्हायरल झाले होते. संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात 'स्लिप बॉय' पासून कामाला सुरुवात केली. पुढे आता त्याच कारखान्याचे चेअरमन आहेत.

Maharashtra Political Crisis
आमदारांवर कारवाईची टांगती तलवार कायम

संजय शिरसाट : शिवसेनेचे शहरसंघटक म्हणून संजय शिरसाट यांचा 1985 मध्ये राजकीय प्रवास सुरु झाला. त्यापूर्वी रिक्षाचा व्यवसाय सांभाळत होते. राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर 1995 आणि 99 मध्ये मराठवाडा औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी संजय शिरसाट यांची निवड झाली. औरंगाबाद येथे 2000 च्या महापालिका निवडणुकीत कोकणवाडी वॉर्डातून ते पहिल्यांदा निवडून आले. 2001 मध्ये सभागृहनेते पदाची त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. 2003 मध्ये स्थायी समिती, 2005 मध्ये पुन्हा नगरसेवक झाले. महापालिकेच्या राजकारणासोबतच पश्‍चिम मतदारसंघ आणि शहराजवळील भागाशी संपर्क वाढवत विधानसभेची तयारी केली. 2009, 2014 व 2019 अशा सलग तीन विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्ता आल्यापासून शिरसाट यांना मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. परंतु, पक्षातून अद्याप मंत्रिपदी वर्णी न लावल्याने ते प्रचंड नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपावून शांत केल्याचे बोलले जाते.

तानाजी सावंत : उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा वाशी मतदार संघाचे तानाजी सावंत विद्यमान आमदार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव गावात त्यांचा जन्म 1 जून 1964 साली जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सावंत यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर पी.एच.डी पूर्ण करुन प्राध्यापक म्हणून त्यांनी काही वर्षं काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 2015 मध्ये शिवसेनेचा भगवा हाती घेतला. अल्पावधीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मर्जी संपादन केली. त्यानंतर संघटनेत संपर्कप्रमुख, उपनेते, युती सरकारमध्ये मंत्री अशी पदे भूषविली. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरेंना सोडचिट्टी देत, शिंदेना पाठिंबा दिला. सध्या आरोग्य मंत्री असून सावंत यांची अनेक विधाने वादग्रस्त ठरली आहेत.


यामिनी जाधव : शिवसैनिक ते आमदार असा यामिनी जाधव यांचा राजकीय प्रवास आहे. यामिनी जाधव उच्चशिक्षित असून 2012 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. ठाकरेंचे विश्वासू आणि कट्टर शिवसैनिक असलेल्या यामिनी जाधव यांच्यावर विविध समित्यांची जबाबदारी देखील सोपवण्यात आली होती. पुढे 2019 च्या भायखळा विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून आमदारकीची तिकीट मिळाली आणि त्या पहिल्याच टर्ममध्ये आमदार झाल्या. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी 15 कोटींचा आरोप केल्यानंतर ईडीकडून छापे मारण्यात आले. जाधव कुटुंबियांनी त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिल्याचे बोलले जाते.

चिमणराव पाटील : जळगाव जिल्ह्यातील पारोळा-एरंडोल मतदार संघाचे चिमणराव पाटील विद्यामान आमदार आहेत. शिवसेनेची जळगाव जिल्ह्यात ताकद वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. शिवसेनेचे आमदार म्हणून ते तिसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेले आहेत. जनता पार्टीपासून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1978 मध्ये त्यांनी पहिल्यांदा जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थात जेडीसीसीच्या माध्यतातून राजकारणाचा श्रीगणेशा केला. मार्केट कमिटी, भू विकास बँक, राहूरी कृषी विद्यापीठ आदींमधून त्यांची राजकीय ठसा उमटवला. ज्येष्ठ आमदार असताना वारंवार त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिला. शिंदेंसोबत सुरतला गेलेले ते पहिले आमदार होते.

भरत गोगावले : रायगडमधील महाड तालुक्यातील खरवली गावात आमदार भरत गोगावले यांचा जन्म झाला. कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गोगावले यांनी 1992 पासून राजकारणात पाऊल ठेवले. सगल दोन वेळा जिल्हा परिषदेत पशु, अर्थ, बांधकाम अशा विविध खात्यांचे सभापती पदी कामे केले. तीन वेळा आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. रायगडमध्ये शिवसेनेचा आक्रमक नेता म्हणून भरत गोगावलेंनी ओळख प्रस्तापित केली आहे. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि शेतकरी पक्षाचा दबदबा असताना गोगावले यांनी जिल्ह्यात शिवसेना मजबूत केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा देणाऱ्यामध्ये गोगावले यांचा सहभाग होता. एकनाथ शिंदे यांनी पुढे त्यांच्यावर प्रतोद पदाची जबाबदारी महत्वाची सोपवली.

लता सोनवणे : लता सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार आहेत. पहिल्यांदाच टर्मच्या त्या आमदार आहेत. माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे त्यांचे पती. जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला पाठिंबा दिला असला तरी, त्यांनी ठाकरेंवर कोणतेही भाष्य केलेले नाही.

प्रकाश सुर्वे : मागाठाणे विधानसभा मतदार संघाचे प्रकाश सुर्वे विद्यमान आमदार आहेत. सुरुवातीला भाजीचा व्यवसाय करणाऱ्या सुर्वेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री केली. 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. सलग दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला पाठिंबा सुरुवातीला देणारे ते एक आहेत. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुर्वेंकडून अनेक वादग्रस्त वक्तव्य झाली. नुकताच माजी नगरसेविका आणि सुर्वे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

बालाजी किणीकर : अंबरनाथ विधानसभा मतदार संघातून आमदार बालाजी किणीकर हे निवडून आले आहेत. सलग तीन वेळा शिवसेनेच्या चिन्हावर विधानसभेवर निवडून आले आहेत. किणीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. किणीकर सध्या शिवसेना शिंदे गटाचे खजिनदार म्हणून कार्यरत आहेत.

अनिल बाबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामिल झालेले अनिल बाबर सांगली खानापूर - आटपाटी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. 1972 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. जिल्हा परिषद, पंचायत समितीवर सभापती होते. 1990 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 1999 पासून सलग पाच वर्षे शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभेत निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिल्याने त्यांना अपात्र करावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

महेश शिंदे : कोरेगाव विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदाच महेश शिंदे हे शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले. 2014 पर्यंत भाजपचा प्रचार करणाऱ्या शिंदे यांनी 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश करत विधानसभेवर निवडून गेले. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे समर्थन केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलावर आहे.

संजय रायमुलकर : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचे आमदार संजय रायमुलकर आमदार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडखोरीला पाठिंबा दिल्यानंतर रायमुलकर यांना शिवसैनिकांच्या मोठ्या रोषाचा सामना करावा लागला होता. समृद्धी महामार्गाच्या काम विरोधात आवाज उठवत, आंदोलन छेडले होते.

रमेश बोरनारे : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदार संघाचे रमेश बोरनारे विद्यमान आमदार आहेत. बोरनारेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोरनारे यांना अटक करावी, या मागणीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, शिंदे यांच्या बंडखोरीला समर्थन दिल्यानंतर भाजपाची आरोपाची धार थंडावली.

बालाजी कल्याणकर : बालाजी कल्याणकर यांचा नांदेड उत्तर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. कल्याणकर नांदेड शहरातील एकमेव आमदार आहेत. कल्याणकर यांनी एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे.

  1. Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
  2. Maharashtra Political Crisis : आमदारकी संकटात असलेले 'ते' 16 आमदार कोण?
  3. Maharashtra political Crisis: सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम फैसला! या आहेत शक्यता?
Last Updated :May 11, 2023, 7:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.