ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : 'भाजपला राष्ट्रवादी फोडण्यात अपयश आले तर..', पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे विधान

author img

By

Published : Jul 8, 2023, 8:22 PM IST

महाराष्ट्रात भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात अपयश आल्यास सत्ताधारी आघाडीत अडचणी निर्माण होऊ शकतात, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. वाचा ईटीव्ही भारतचे वरिष्ठ प्रतिनिधी अमित अग्निहोत्री यांचा खास रिपोर्ट...

Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : काँग्रेसचे म्हणणे आहे की, भाजप राष्ट्रवादीला फोडण्यासाठी सर्व मार्गांचा वापर करत आहे. परंतु जर अजित पवार पक्षांतरविरोधी कायद्यापासून बचाव करण्यासाठी पुरेशा आमदारांची व्यवस्था करण्यात अपयशी ठरले तर भाजपची योजना अयशस्वी होईल.

'अजित पवारांकडे पुरेशी संख्या नाही' : यासंदर्भात माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादीचे 53 आमदार आहेत. पक्षांतर विरोधी कायदा टाळण्यासाठी अजित पवार यांना दोन तृतीयांश म्हणजेच 36 किंवा 37 आमदारांची आवश्यकता आहे. ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार शरद पवारांकडे 19 आमदार आहेत. याचाच अर्थ अजित पवारांकडे पुरेशी संख्या नसावी. जर त्यांच्याकडे 37 पेक्षा कमी आमदार असतील तर शरद पवार पक्षांतर विरोधी कायद्यानुसार बंडखोरांना अपात्र ठरवण्यासाठी सभापती किंवा निवडणूक आयोगाला सांगू शकतात.

महाराष्ट्रात भाजपची अडचण होत आहे : चव्हाण म्हणाले की, अजित पवार आणि भाजपला 37 आमदारांचे समर्थन मिळवण्यास अडचण येत आहे. त्यामुळे भाजप पैसा आणि धमकावणे यासारख्या युक्त्यांचा वापर करत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात भाजपची मोठी अडचण होत आहे. त्यांनी पक्षात काँग्रेस, शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले नेते घेतले आहेत. अजित पवारांसोबत आलेल्या 8 जणांना मंत्रिपदे मिळाली, पण जे नेते आधी भाजपात गेले ते आपली पाळी येण्याची वाट पाहत आहेत.

'सत्ताधारी आघाडीत अनेक गट पडले आहेत' : पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले नेते मंत्रीपदासाठी वाट पाहत आहेत. आरएसएस आणि भाजपचे जुने नेते देखील वाट पाहत आहेत. सत्ताधारी आघाडीत अनेक गट पडले आहेत. नुकताच शिंदे गटाच्या आमदारांनी एका बैठकीत हाणामारी झाल्याचा आरोप केला होता. चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव यशस्वी झाला नाही, तर सगळेच अडचणीत सापडतील.

'काँग्रेसमध्ये फूट पडणे शक्य नाही' : पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, भाजपचे काही नेते काँग्रेस पक्षाला खिंडार पाडण्यासाठी अशाच युक्त्या वापरत आहेत. परंतु ते यशस्वी होणार नाहीत. काँग्रेसचे 45 आमदार आहेत. भाजपला काँग्रेस फोडायची असेल, तर पक्षांतरविरोधी कायदा टाळण्यासाठी 30 आमदारांची गरज आहे. काँग्रेसमध्ये फूट पडणे शक्य नाही. 12-15 आमदार भाजपमध्ये येण्याच्या तयारीत असल्याची अफवा आहे, असे ते म्हणाले.

'..म्हणून काँग्रेस एकसंध आहे' : ते म्हणाले की, कॉंग्रेसमध्ये अजित पवारांसारखा आमदार खेचून आणणारा कोणताही नेता नाही. त्यामुळेच काँग्रेस एकसंध असून पक्षाला कोणताही धोका नाही. ते म्हणाले की, काँग्रेस प्रदेश युनिटच्या वरिष्ठ नेत्यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली होती. त्यादरम्यान लोकसभा निवडणुकीबाबतही चर्चा झाली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करेल. ते म्हणाले की, आमदार भाजपमध्ये गेले हे खरे असले तरी जनता त्यांच्याकडे गेली की नाही हे पाहायचे आहे.

हेही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis : मंत्रीपद हुकले, तिकिटाचीही गॅरंटी नाही...राष्ट्रवादीच्या सत्तेतील प्रवेशाने शिंदे गटात अस्वस्थता!
  2. Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षात पुतण्या पडतोय काकांवर भारी! जाणून घ्या कोणाकडे आहेत किती आमदार?
  3. Maharashtra Political Crisis : अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 'या' आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, जाणून घ्या सविस्तर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.