ETV Bharat / state

बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलच्या स्मारकाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 3:04 PM IST

Mahaparinirvan Din 2023
Mahaparinirvan Din 2023

Mahaparinirvan Din 2023 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आज चैत्यभूमीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पुढील महापरिनिर्वाण दिनाला इंदू मिलच्या जागेवरील स्मारकास अभिवादन केलं जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई Mahaparinirvan Din 2023 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमिवर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या डॉ बाबासाहेब स्मारकाच्या कामाबाबत भाष्य करत पुढील महापरिनिर्वाण दिनाला स्मारकास अभिवादन करण्याची संधी अनुयायांना मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय.



देशाची प्रगती ही आंबेडकरांमुळेच : याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जगात भारत वेगानं प्रगती करत आहे. आज जगातली सर्वात मोठी 5 वी अर्थव्यवस्था भारत झालीय. लवकरच जगातली तिसरी अर्थव्यवस्था होणार आहे. याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. त्यांच्या संविधानाला जाते. या सविधनानं देशात अशी व्यवस्था बघितली की ज्यानं मूठभर लोकांना न्याय देण्याऐवजी असंख्य बहुजनांना न्याय देण्याची व्यवस्था केली. म्हणूनच आज ही प्रगती आपण या ठिकाणी बघत आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय की, मला कुठल्याही धर्म - ग्रंथापेक्षा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान अतिशय प्रिय आहे. कारण हे संविधानचं भारताला प्रगती पथावर नेऊ शकतं. हे संविधान तयार करत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समता व बंधुता या भगवान गौतम बुद्धांच्या तत्वावर आधारीत संविधान तयार केलंय. म्हणूनच जगात एक वेगळी प्रतिमा तयार झालीय. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रत्येक कार्य भारताच्या निर्मितीसाठीच घडलं असल्यानं आज आपण त्यांना महामानव म्हणतो. कारण जिथं इतरांचे विचार संपतात तिथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सुरु व्हायचे.

जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीचं स्मारक : या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी इथं लाखो अनुयायी आले आहेत. बाबासाहेबांनी अर्थव्यवस्था, शेती, सिंचन, महिला धोरण, शिक्षण अशा अनेक विविध क्षेत्रासाठी धोरणांची आखणी सुद्धा करुन दिलीय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अलीकडेच 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यामध्ये उत्साह होता पण संविधानाचं महत्त्व आजच्या पिढीला समजलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा होता. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला ही सुद्धा फार मोठी गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

शरीर भस्म होतं, परंतु नाव अमर होतं : याप्रसंगी बोलताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, आज लाखोंच्या संख्येनं देशातील तसंच राज्यातील विविध भागातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आहेत. या सर्वांमध्ये जी शिस्तप्रियता दिसत आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. राज्य सरकार तसंच मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा इथं येणाऱ्या प्रत्येक अनुयायांसाठी व्यवस्था केल्यामुळं त्यांचं मी अभिनंदन करतो. देशातील करोडो दलित बाबासाहेबांना मसिहा म्हणून बघतात. भारताला जातीयवादापासून सुटका देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. इंदू मिल इथं होणारं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक हे विश्वातील त्यांच्या प्रत्येक अनुयायीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असं राज्यपाल रमेश बैस म्हणाले.

हेही वाचा :

  1. महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधान मोदींसह विविध नेत्यांनी बाबासाहेबांना केले अभिवादन
  2. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लोटला जनसागर; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडून बाबासाहेबांना अभिवादन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.