ETV Bharat / state

MAHA Rain Update: राज्यात अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, चिपळूण शहराला पुराचा वेढा

author img

By

Published : Jul 22, 2021, 6:56 AM IST

Updated : Jul 22, 2021, 2:23 PM IST

MAHA Rain Live Update
22 जुलैच्या महत्वाच्या बातम्या

13:40 July 22

रत्नागिरीतील पुरपरिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई - 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील पूरपरीस्थितीचा आढावा घेतला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदीची तटकरे यांच्याशी चर्चा केली आहे. तात्काळ आपतकालीन विभागाकडून सर्व मदत पोहचवण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

पूराने वेढलेल्या गावातील आणि शहरांतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हेलिकाँप्टरचीही मदत घेण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत. पूरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त बोटी तात्काळ पोहवण्याचेही आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावेळी दिले आहेत.

13:40 July 22

रत्नागिरीत बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू -  विजय वडेट्टीवार

नागपूर - रत्नागिरी जिल्ह्यात पुराचे मोठ संकट उभे झाले आहे. चिपळूण शहर दोन्ही बाजूने बंद झाले आहे. चिपळूण आणि त्या भागात 2 NDRF च्या टीम पाठविल्या आहेत, त्या थोड्या वेळात तेथे पोहचतील, कोस्टाल गार्डच्या मदतीने बोट तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. वैद्यकीय सहायता आणि जेवणाच्या पॉकेट्सचे वितरण सुरू केले आहे. तर बचाव कार्यासाठी हेलिकॅप्टर उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहे. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर मदत व पुनर्वसन खात्याचे अधिकारी आणि मी स्वतःहा परिस्थितीवर लक्ष देऊन आहे, असेही ते म्हणाले आहे. 

12:50 July 22

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

सांगली - जिल्ह्यात गेल्या 24 तासपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान म्हैसाळ येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे.

12:46 July 22

कोल्हापुरात अनेक रस्ते बंद

कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. कोल्हापूर ते रत्नागिरी हायवे, मलकापूर ते अनुस्कुरा रोड, मलकापूर ते शिरगाव रोड, चरण ते डोणोली रोड बंद करण्यात आले आहेत. 

12:40 July 22

रत्नागिरीकडे पुण्याहून दोन NDRF पथक रवाना

रत्नागिरी - जिल्ह्यात झालेल्या पावसामुले चिपळूणमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशनसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी पुण्याहून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (NDRF) दोन टीम रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघाल्या आहेत. 

12:31 July 22

मेळघाटातील सिपना नदीला पूर

अमरावती - मेळघाट मधील सर्वात मोठ्या सिपना नदीला मोठा पूर आला आहे. पावसाच्या पाण्यामुळे पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे मेळघाटमधील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मागील तीन दिवसांपासून मेळघाटमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. 

12:28 July 22

अरुणावती नदीच्या पुलावर मधोमध अडकला शेतकरी

वाशिम - जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे अरुणावती नदीने रौद्ररूप धारण केले आहे. मानोरा तालुक्यातील सेवादास नगर ते वरोली दरम्यान असलेल्या बंधाऱ्यावरून शेतकरी शेतात जात होता. यावेळी अचानक पाणी वाढल्याने वरोली येथील शेतकरी पुलाच्या मधोमध अडकून पडला आहे. दरम्यान याची माहिती गावकऱ्यांना मिळताच ग्रामस्थ पुलावर पोहचले. मात्र, साहित्य नसल्याने सकाळपासून जाग्यावरच अडकून आहे. दरम्यान प्रशासनाने वेळीच सुटका केली नाही आणि पाणी वाढल्यास वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

12:24 July 22

सिंधुदुर्गात नद्यांना पूर, शेती क्षेत्रात घुसले पाणी, घराचे नुकसान

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे एक घर कोसळले आहे. तर कुडाळ मधील भंगसाळ नदीला पूर आल्यामुळे पावशी गावातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. तर रस्त्यावर पाणी आल्याने सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

12:24 July 22

पालघर जिल्ह्यात मुसळधार, वाडा तालुक्यातील पाझर तलावाला पडले भगदाड

पालघर - जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काल मध्यरात्रीच्या सुमारास वाडा तालुक्यातील शेलटे येथील पाझर तलावाला भगदाड पडले होते. तलावाचे पाणी शेलटे गावात आणि लागवड केलेल्या शेतीत गेल्याने या भागात मोठे नुकसान झाले आहे. गावातील 300 नागरिकांना रात्री प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. 

11:39 July 22

chiplun flood: चिपळूण शहराला पुराचा वेढा, ठिकठिकाणी भरलं पाणी, शेकडो लोक अडकले पाण्यात

chiplun flood
चिपळूण शहराला पुराचा वेढा

रत्नागिरी - जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. चिपळूण, खेड तसेच रत्नागिरीतील ही काही भाग जलमय झाला आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झाले आहे. अनेक ठिकाणी लोकं हे पाण्यात अडकून पडली आहेत. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड, भोगाळे ,परशूराम नगर परिसरात पाणी वाढत आहे. काही ठिकाणी पाच फुटांपेक्षा जास्त पाणी आहे.. तर खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत.

हेही वाचा - रत्नागिरीत पावसाचा हाहाकार, चिपळूणला पुराचा वेढा; मुंबई-गोवा महामार्ग बंद

11:27 July 22

अमरावती जिल्ह्यातील गरजधरी धरण ओव्हरफ्लो

अमरावती - जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील गरजधरी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तर दहिगाव रेचा येथील नाल्याची भिंत फुटून पूर्ण दहिगावत पाणी शिरले आहे. यामुळे अनेक कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. 

11:25 July 22

विश्रोळी धरणाचे तीन दरवाजे उघडले

अमरावती - मेळघाटात पावसाची संततधार सुरुच आहे. घटांग-कुकरू रस्त्यावर दरड कोसळली आहे. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती तर रस्त्यावरून माती हटवण्याचे काम सुरू आहे. तर मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील विश्रोळी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे.

11:18 July 22

अकोल्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

अकोला - जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे. शहरात अनेक भागात घरात पाणी शिरले आहे. दरम्यान घरात अडकलेल्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुरक्षित बाहेर काढले आहे.

10:29 July 22

भारतीय तटरक्षक दलाने एमव्ही कांचनच्या 12 कर्मचाऱ्यांना काढले बाहेर

MAHA Rain Live Update
एमव्ही कांचन जहाजावरील १२ कर्मचाऱ्यांना काढले बाहेर

मुंबई - भारतीय तटरक्षक दलाच्या 'एमव्ही हरमीझ'ने गुजरातच्या उमरगाममध्ये अडकलेल्या एमव्ही कांचन या जहाजावरील १२  कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे. काल या ठिकाणी दूषित इंधन साडल्याची घटना घडली होती.  

10:10 July 22

भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरडी कोसळल्या, वाहतूक बंद

पुणे - श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी जाणाऱ्या मुख्य रस्तात दरडी कोसळल्याने तो बंद करण्यात आला आहे. रस्त्यात सुमारे 5 ते 6 ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत तर काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्याही घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यामुळे भीमाशंकर रस्तावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पोखरी घाटात 3 ते 4 ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. सद्या भीमाशंकर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. 

हेही वाचा - दरड कोसळल्याने श्री क्षेत्र भीमाशंकरला जाणारा मार्ग बंद

09:56 July 22

पुण्याहून एनडीआरएफ पथक कोल्हापुरकडे रवाना

कोल्हापूर - जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळीकडे वाटचाल केली आहे. इशारा पातळीपर्यंत पोहचण्यासाठी केवळ 3 फूट पाणीपातळी बाकी असून पंचगंगा नदी 36 फुट पाणीपातळीवरुन वाहत आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत होणाऱ्या वाढीला लक्षात घेऊन पुण्याहून एनडीआरएफ पथक कोल्हापुरकडे रवाना झाले आहे. 

09:55 July 22

रत्नागिरीत चिपळूण, खेड बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी

रत्नागिरी - जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आले असून चिपळूण, खेड बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. तर काही ठिकाणचे रस्ते बंद झाले आहेत. रत्नागिरीतल्या चांदेराई बाजारपेठेतही 3 ते 4 फूट पाणी साचले आहे. 

09:36 July 22

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई - काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यांने वर्तविली आहे. मुंबईत 45 ते 60 किलोमीटर वेगाने थंड वारे वाहतील, असा इशाराही हवामान विभाग दिला आहे. मुंबईत 21 ते 22 जुलै सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासांत मुंबई शहर परिसरात 74.29 मिलीमीटर, पश्चिम उपनगर परिसरात 60.17 मिलीमीटर, पूर्व उपनगर मिलीमीटर 71.46 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

मुंबई सकाळी 10.46 वाजता 4.39 मीटरची समुद्राला भरती येण्याची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवली आहे. यावेली समुद्रात 4.39 मीटरच्या लाटा उसळू शकतात. असेही त्यांनी सांगितले आहे. 

09:31 July 22

हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले, तापी नदीत 18 हजार 187 क्यूसेक वेगाने विसर्ग

जळगाव - जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज गुरूवारी सकाळी 7 वाजता धरणाचे 12 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. तापी नदीपात्रात 18 हजार 187 क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हतनूर धरणाच्या खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये, अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

09:03 July 22

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ

कोल्हापूर - जिल्ह्यात बुधवारपासून पावसाचा जोर सुरूच आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सद्याची पाणी पातळी 36 फुटांवर पोहचली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून धोका पातळी 43 फूट इतकी आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी गाठायला केवळ 3 फूट पाणीपातळी बाकी आहे. तर मलकापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर येल्लुर गावाजवळ 1 फूट पाणी आल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे. कुंभी धरणातून एकूण 780 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. किरवे येथे देखील कोल्हापूर गगनबावडा रस्तावर पाणी आल्याने रास्ता बंद केला आहे. गडहिंग्लज तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू असून नीलजी व ऐनापूर हे दोन बंधारे पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गवर दुपारपर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे. बुधवारी संध्याकाळी 7 वाजता फोंडाघाट मार्गावर दाजीपूर जवळ पठाण पूल येथे झाड कोसळून तब्बल 4 तास वाहतूक ठप्प झाली होती. रात्री 12 वाजता प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ व वाहानधारकांनी अथक प्रयत्नातून झाड दूर करून वाहतूक सुरु केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.

08:24 July 22

सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली

रायगड - महाडमध्ये अद्याप पूरस्थिती कायम आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे तर महाड शहरात पाणीच पाणी झाले आहे. 

08:22 July 22

मानवत तालुक्यातील नद्यांना पूर, 8 गावांचा संपर्क तुटला

परभणी - जिल्ह्यातील पालम, मानवत तालुक्यातील नद्यांना पूर, सुमारे 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा पुरामुळे अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली.

07:54 July 22

नाशिकः त्र्यंबकेश्वर परिसर जलमय

त्र्यंबकेश्वर परिसर जलमय

नाशिक - जिल्ह्यात सर्वदूर बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर परिसरातील रस्ते हे जलमय झाले आहेत. 

07:11 July 22

कल्याण - नगर राष्ट्रीय महामार्ग बंद

कल्याण - कल्याण - नगर या राष्ट्रीय महामार्ग जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे कल्याण ते मुरबाडपर्यत ठिकठिकाणी मार्गावर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्यरात्री दोन वाजल्यापासून कल्याण - नगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. नगरहुन येणाऱ्या वाहनांना मुरबाड येथे थांबावे लागले आहे. तर याच मार्गे दूध व भाजी वाशी मार्केटला जाते. मार्गावर पाणी असल्यामुळे ही वाहने मुरबाड येथे अडकून पडली आहेत. यामुळे दूध, भाजीपाला मार्केट वर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

07:11 July 22

ठाणेः गणेशपुरी पोलीस आणि भिवंडीतील तरुण ठरले देवदूत

भिवंडीतील तरुण ठरले देवदूत

भिवंडी (ठाणे) - 21 जुलैच्या मध्यरात्री उशिरा पासून पहाटे अचानक पाऊस वाढल्याने भिवंडी-वाडा मार्गावर पाणी साचल्याने रस्ते बंद झाले आहेत. मुसळधार पाऊस असल्यामुळे रस्त्यावरील वाहने वाहून जातील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी गणेशपुरी पोलीस आणि ठाण्यातील तरुणांनी रात्री उशिरा पर्यंत मदत कार्य करत रस्त्यावर येत लोकांना मदतीचा हात दिला. पाण्यात अडकलेल्या गाड्या आणि लोकांना बाहेर काढण्याचे मदत कार्य केले. भरपावसात माणुसकीचे दर्शन या महामार्गावर घडले आहे.

06:38 July 22

नाशिकः खर्डी ते इगतपुरी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे वाहतूक बंद

नाशिक - इगतपुरी तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कसारा घाटात तुफान पाऊस कोसळत असल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेले असून काही ठिकाणी रेल्वे रूळावर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. खबरदारी म्हणून मध्य रेल्वेने खर्डी ते इगतपुरी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. बुधवार रात्री 10 वाजताच्या दरम्यान घाटमाथ्यावरील इगतपुरी, शहर व परिसरासह कसारा घाट व पश्चिम पट्ट्यातील काही गावामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. खर्डी ते इगतपुरी दरम्यान घाट रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळावर आणि स्थानकामध्ये पाणी भरले आहे. याशिवाय मुसळधार पावसामुळे घाट विभागात दरडी कोसळण्याच्या घटना घडलेली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने 10 वाजून 15 मिनिटांनी खर्डी ते इगतरपुरी रेल्वे स्थानकादरम्यानची रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या अनेक लांबपल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्या अडकून पडलेले आहेत.

06:38 July 22

नाशिकः अमरावती एक्स्प्रेस अडकली

 नाशिक - खर्डी ते ईगतपुरी स्थानकांदरम्यान मुंबईतून निघालेली अमरावती एक्सप्रेस अडकलेली आहेत. याशिवाय उंबरमाळी येथे रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी भरल्याने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहे. घाट विभागातील परिस्थितीवर मध्य रेल्वे प्रशासनाचे लक्ष ठेवून आहे. तसेच रेल्वेचे अभियांत्रिकी पथक आणि कर्मचारी घाट विभागात तैनात करण्यात आले आहे.

06:16 July 22

ठाणेः कसारा घाटात दरड कोसळली, रेल्वे ट्रॅकमध्ये 3 फूट पाणी, वाहतूक ठप्प

ठाणे - पावसाने बुधवारी रात्री पुन्हा कहर करीत शहापूर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. कसारा घाटातील महामार्गात पुन्हा दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेच्या मार्गावर कसारा येथे  रुळावर पावसाचे पाणी साचल्याने रेल्वे वाहतूकही ठप्प आहे.

मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील उंबरमाळी स्थानकात रेल्वे ट्रॅकमध्ये 3 फूट पाणी भरले आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या व लोकल ट्रेन कसारा व खर्डी,आठगाव स्थानकात थांबविण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहापूर तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. याचा फटका रेल्वे मार्गाबरोबर आता रस्ते वाहतुकीलाही बसला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर जुन्या कसारा घाटात दरड कोसळली आहे. नाशिककडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन ग्रुपचे सदस्य शाम धुमाळ व त्यांची टीम मदत कार्य करत आहे. तसेच कसारा पोलीस ही घटनास्थळावर पोहचले आहेत.

Last Updated :Jul 22, 2021, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.