ETV Bharat / state

वातावरणातील बदलामुळे मुंबईकरांमध्ये आजारात वाढ, आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला काय?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 8:15 PM IST

Increasing Winter Sickness: ऐन हिवाळ्यात पाऊस झाल्यानं मुंबईतील वातावरणात बदल झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी, तापासारखे आजार बळावत आहेत. (change in climate in Mumbai) अशा बदलत्या वातावरणात मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्यतज्ज्ञांनी केलं आहे.

Increasing Winter Sickness
हिवाळ्यातील आजार

हिवाळ्यातील आजारांवर मुंबईकरांना डॉक्टरांचा सल्ला

मुंबई Increasing Winter Sickness : सध्या हिवाळा सुरू आहे. पहाटेच्या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी अनेकजण मॉर्निंग वॉकला जाताहेत; मात्र यावर्षी म्हणावी तशी अजून कडाक्याची थंडी पडली नाही किंवा कडाक्याच्या थंडीचा अनुभव आलेला नाही. मागील आठवड्यात राज्यातील काही भागासह मुंबईत पावसाने हजेरी लावली. हिवाळ्यात पाऊस पडल्यामुळं मुंबईकरांची तारांबळ उडाली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबईत सततच्या वातावरणातील बदलामुळं म्हणजेच कधी पाऊस, कधी जोराची थंडी तर कधी वातावरणामधील वाढते तापमान याचा सामना मुंबईकरांना करावा लागत आहे. या सततच्या बदलामुळे मुंबईकरांच्या आजारात वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्यतज्ज्ञांनी केलं आहे. (increase in winter sickness among citizens)


तापमान बदलामुळं श्वसनाचे आजार : आपण जर पाहिलं तर ऑक्टोबर महिन्यापासून तापमानात मोठा बदल दिसत आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी, अधूनमधून पाऊस. त्यामुळे वाढलेली आद्रता ह्या सर्व गोष्टींना आपण सामोरे जातोय. यामुळे साधारण तापमान आणि उच्च तापमान यांच्यामध्ये खूप मोठा फरक दिसून येतोय. या प्रकारच्या वातावरणामुळं श्वसन संस्थेसाठी बाधक असलेल्या अनेक प्रकारच्या विषाणूंना व जिवाणूंना अतिशय पोषक वातावरण ठरतयं. परिणामी श्वसन संस्थेच्या आजारांत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं आरोग्यतज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं आहे.


कशी काळजी घ्याल? सध्या हवेतील प्रदूषणामुळं आणि सततच्या वातावरणातील बदलामुळं थंडी, ताप, खोकला तसेच श्वसानाचे आजार वाढत आहेत. ह्या आजारांपासून वाचण्यासाठी आपण विविध प्रकारे काळजी घेऊ शकतो. जसे की, कोरोनाकाळात आपण तोंडावर मास्क लावत होतो तसेच घराबाहेर पडताना मास्क लावणे. तोंडाला किंवा नाकाला सतत हात लावू नये. खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे किंवा सॅनेटाईझरचा वापर करणे. गरज असेल तरच गर्दीत जा, अन्यथा गर्दीत जाणं टाळा, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे.

हिवाळ्यात पक्षाघाताची शक्यता : थंडीच्या दिवसांत चेहऱ्याचा किंवा शरीराचा पक्षाघात होण्याची शक्यताही अधिक असते. त्यासाठी चेहरा व कान झाकून घेणे, तसेच रक्तदाब व साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. थंडीत मुळात पचन क्रिया सुधारल्याने भूक अधिक लागते. वास्तविक पाहता हिवाळ्याच्या हंगामात जास्त कॅलरीज देणारे व ताजे, गरम अन्न खावे. दूध, तूप, मटण, मासे, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, तीळ, सुका मेवा यांचा आहारात समावेश करावा. संतुलित आहार, पुरेशी झोप व व्यायाम या सूत्रांचा वापर व गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

व्यायाम व योगासनांवर भर द्यावा : अलीकडे वाढत असलेला सांधेदुखीचा आजारही याच दिवसांत वाढतो. यासाठी नियमित व्यायाम व योगासने फायदेशीर आहेत. दुग्धजन्य पदार्थ घेतल्याने अतिरिक्त ऊर्जा व कॅल्शियमचा तुटवडा भरून निघतो. हाडे मजबूत होतात. थंडीमध्ये दमा व खोकल्यासाठी उबळ दाटण्याची शक्यता असते. त्यामुळे आवश्यक त्या इन्हेलरचा व औषधांचा वापर करणे अपरिहार्य आहे.

हेही वाचा:

  1. बहाडोलीच्या जांभळांना जीआय मानांकन; शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता वाढण्यास होणार मदत
  2. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली शेतीच्या नुकसानीची पाहणी
  3. राजर्षी शाहूंच्या कोल्हापुरात नवा पायंडा; विधवा महिलांना सन्मान देऊन करण्यात आला गृहप्रवेश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.