मुंबई - कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. त्यामुळे सोने व चांदीच्या व्यापारासाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या जळगावातील सराफ बाजाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असल्याने सलग दुसऱ्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या सराफ बाजाराला कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत सराफा व्यापारी हवालदील झाले आहेत.
कडक निर्बंधामुळे लागला ब्रेक
मुंबईत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 45 हजार 720 रुपये तर चांदी प्रति 1 किलो 71 हजार 130 रुपये इतका दर आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जाणारा अक्षय्य तृतीयेचा सण शुक्रवारी (दि. 14 मे) आला आहे. या सणाच्या मुहूर्तावर सोने खरेदीला खूप महत्त्व आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या कडक निर्बंधामुळे सोने खरेदीला ब्रेक लागला आहे.
ऑनलाइन खरेदीमुळे 20 टक्क्यांपर्यंत होण्याचा अंदाज
झवेरी बाजारात प्रत्येक दिवशी 200 ते 300 कोटींची उलाढाल होते तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 300 ते 500 कोटीपर्यंत उलाढाल होते. यावर्षी ऑनलाइन खरेदीमुळे 20 टक्क्यांपर्यंत उलाढाल होईल, असा अंदाज इंडीयन बुलियन असोसिशनचे कुमार जैन यांनी व्यक्त केला आहे. कोरोनामुळे बाजारपेठा बंद आहेत. पण, ज्यांना सोने खरेदी करायचे आहे. ते फोनवरुन सोने बुक करतात. काही जण ऑनलाइन पेमेंटही करतात. बाजारपेठ सुरू झाल्यानंतर त्यांना सोने वितरीत केले जाते. मात्र, कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने संपूर्ण व्यापार विस्कळीत झाला आहे.
अक्षय तृतीयेच महत्व
साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीयेचे एक शुभ मुहूर्त मानला जातो. असे मानले जाते की या पवित्र दिवशी कोणतेही व्यवसाय, धार्मिक किंवा मंगल काम केले तर त्याचे चांगले फळ प्राप्त होते. या दिवशी लोक सोने, चांदी, वाहन, जमीन इत्यादी वस्तू खरेदी करतात.
हेही वाचा - पश्चिम रेल्वेची मालवाहतूक सुसाट; 106 कोटी 63 लाखांची कमाई