ETV Bharat / state

Nitin Gadkari On BJP : अर्थसंकल्पीय तरतूद नसतानाही देशात कामे, गडकरींकडून सरकारच्या प्रगतीची ब्ल्यू प्रिंट सादर

author img

By

Published : Jun 23, 2023, 6:56 PM IST

Nitin Gadkari On BJP
Nitin Gadkari On BJP

केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारने आर्थिक रणनीतीत केलेल्या बदलाचे दृश्य परिणाम आता सर्वत्र दिसून येत आहेत. लाखो कोटी रुपयांच्या विकासकामांना वेग आला असून, या सरकारने विकासकामांसाठी पैशांची कमतरता नसल्याचे दाखवून दिले आहे, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत केला.

मुंबई : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या प्रगतीची ब्ल्यू प्रिंट सादर करताना आकडेवारीसह देशाच्या गेल्या नऊ वर्षांतील सर्वांगीण विकासाची माहिती दिली. यावेळी गडकरी यांनी देशभरात सुरू असलेल्या अनेक रस्ते विकास कामांची माहिती दिली. देशाची आर्थिक स्थिती सुधारत असून, अर्थसंकल्पीय तरतूद नसतानाही देशात कामे कशी झाली, हे त्यांनी यावेळी सांगितले. लोकसहभागातून आणि उद्योजकांच्या मदतीने निधी उभारण्याचे काम सुरू असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.

उद्योजक म्हणजे दुश्मन नव्हेत : यापूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कालावधीत भांडवली गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना दुश्मनाप्रमाणे पाहिले जात होते. वास्तविक देशाच्या प्रगतीमध्ये उद्योजकांचा मोठा वाटा असतो हे, मान्य करायला हवे. जर नवनवीन उद्योग आले आणि त्यासाठी मदत केली तर, लाखो लोकांना रोजगार मिळतो. हे या सरकारने दाखवून दिले आहे. उद्योजक आणि भांडवली गुंतवणूक करण्यात सरकारनेही स्वास्थ्य दाखवले पाहिजे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

बायो इथेनॉलचा शेतकऱ्यांना फायदा : पेट्रोलमुळे सर्वत्र प्रदूषण होत असून त्याला बायो इथेनॉल हा अतिशय उत्तम पर्याय आहे. या पर्यायामुळे वाहनांच्या प्रदूषणात आणि इंधनाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीमुळे त्यांच्या ऊसाला दर मिळणार आहे. शेतकऱ्यांचा यात मोठ्या प्रमाणात फायदा होईल. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ही होईल असेही, यावेळी गडकरी म्हणाले.

मुंबईतील माहीम चौक सर्वात प्रदूषित : मुंबईतील माहीम येथील चौक हा सर्वात प्रदूषित चौक आहे. या चौकात मोठ्या प्रमाणात गाड्यांचे प्रदूषण होत असून मुंबईकरांना त्याचा मोठा त्रास होत आहे. वास्तविक मुंबईतील बेस्टच्या गाड्या आता आम्ही इलेक्ट्रिक वाहनांवर चालवत आहोत. त्यामुळे हळूहळू मुंबईकरांना गारेगार, विना प्रदूषणाचा प्रवास करता येणार आहे असेही त्यांनी सांगितले. तर यात सोबत इनोव्हा, सुझुकी, टोयोटा यासारख्या कंपन्यांची आम्ही करार केला असून यापुढे इलेक्ट्रिक वाहने जास्तीत जास्त निर्माण केली जातील. तसेच इथेनॉलच्या वापरावर चालणारी वाहनेही निर्मिती केली जातील. त्यामुळे आता यापुढे प्रदूषणाचा आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. त्याशिवाय लाखो रोजगार निर्मिती होईल. हाच प्रगतशील भारत असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - JP Nadda : 'इंदिरा गांधींनी ज्यांना तुरुंगात टाकले तेच आज..' जेपी नड्डांची विरोधकांवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.