मुंबई: नजीकच्या काळात ऐतिहासिक, खासकरून शिवकालीन, चित्रपटांना प्रेक्षकांचा दिलखुलास पाठिंबा मिळताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणसाचे दैवत. त्यांच्याप्रती असलेल्या प्रत्येक मराठी माणसाच्या भावना गर्वाच्या आहेत. हल्ली प्रदर्शित झालेले फतेहशिकस्त, हिरकणी, पावनखिंड, शेर शिवराज सारखे अनेक शिवकालीन चित्रपट प्रेक्षकांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले. त्यामुळे या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर देखील चागली कमाई केली आहे. सध्या या चित्रपटावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
बाजीप्रभू देशपांडे यांची कथा - ऐन दिवाळी प्रदर्शित झालेला हर हर महादेव हा चित्रपट सुद्धा अपवाद नाही, कारण प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून त्याने उत्तम गल्ला जमविण्यास सुरुवात केली होती. तसेच प्रेक्षक आणि हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी या चित्रपटाची तोंडभरून स्तुती केली आहे. हर हर महादेव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि पावनखिंडीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांची कथा सांगण्यात आली आहे. यात सुबोध भावे छत्रपतींच्या भूमिकेत असून हिंदी मनोरंजनसृष्टीतील नावाजलेले मराठमोळे नाव शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहेत. ते दोघं आणि इतरही कलाकारांच्या सशक्त अभिनयाने नटलेला हा चित्रपट अजूनही प्रेक्षागृहात सुरू आहे.
चित्रपटाचे शोज बंद - परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारी दृश्ये यात आहेत, असे सांगत काही राजकारणी लोकांकडून या चित्रपटांचे खेळ थांबविले गेले. त्यातील काहींचे असेही मत आहे. बाजीप्रभू देशपांडे यांना नकारात्मकरित्या दर्शवण्यात आले आहे. चित्रपटाचे शोज बंद पाडण्याचे प्रकार मुंबई, ठाणे आणि पुण्यातही होत असून पोलिसांनी निदर्शकांना अटक केली आहे.
इतिहासाच्या अनेक प्रवाहांचा, विचारांचा अभ्यास - परंतु आपल्या प्रेमाने बनविलेल्या कलाकृतीला अशी वागणूक मिळत असल्याचे पाहून चित्रपटाचे निर्माते झी स्टुडिओज आणि गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स तर्फे एक स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे. त्यात लिहिले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची अस्मिता. त्यांची मूल्ये हृदयाशी बाळगूनच आपण वाटचाल केली आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी, त्यांचा इतिहास गैरपद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाही, याची आम्ही पूर्ण खबरदारी घेतली आहे. तज्ञ इतिहासकारांचा सल्ला घेऊन आणि इतिहासाच्या अनेक प्रवाहांचा, विचारांचा अभ्यास करून, संदर्भ घेऊन आम्ही हर हर महादेवची निर्मिती केली आहे. आम्हाला विश्वास आहे. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या वीर योध्यांप्रती आम्हाला असलेला आदर सिनेमा पाहणाऱ्यांना नक्कीच पटेल.
महाराजांची शिकवण भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हेतू - या चित्रपटाच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्या भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा शुद्ध हेतू आहे. सामान्य प्रेक्षकांवर झालेला हल्ला हा निषेधार्ह आहे. आपल्या राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था प्रणालीवर संपूर्ण विश्वास आहे. जाता जाता हे नमूद करणे गरजेचे आहे की, हर हर महादेवमध्ये राज ठाकरे यांनी व्हॉईस ओव्हर दिलेला आहे.