ETV Bharat / state

Live In Relationship : 'लिव्ह इन रिलेशनशिप' मधून घडणाऱ्या क्रूर घटनांना असा घाला आळा

author img

By

Published : Jun 8, 2023, 5:53 PM IST

Updated : Jun 8, 2023, 7:36 PM IST

Live In Relationship
'लिव्ह इन रिलेशनशिप'

प्रेम करणं म्हणजे नेमकं काय, याचं वर्णन करणं खूप कठीण आहे. प्रेमापोटी काहीपण करणार, असं पण पुष्कळवेळा ऐकलं, बोललं, बघितलं आहे; मात्र हेच प्रेम जेव्हा दोन्हींकडून कमी होतं त्यावेळेस दोघांमध्ये अनेक समस्या निर्माण होतात. सध्या 'लिव्ह इन रिलेशनशिप'चे प्रमाण वाढल्याचे बोलले जात आहे. मध्यप्रदेशमधील इंदूर खंडपीठाने एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान या मुद्द्याला 'सामाजिक शाप' संबोधले होते. 'लिव्ह इन रिलेशनशिप' लैंगिक गुन्हे पसरवण्यास प्रोत्साहन देत असल्याचे देखील म्हटले होते. मुंबई शहर व मुंबई उपनगरमध्ये 'लिव्ह इन रिलेशनशिप'चे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या काळात कुटुंबातील सुसंवाद कमी झाल्यामुळेच अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत.

'लिव्ह इन रिलेशनशिप'विषयी बोलताना तज्ज्ञ

मुंबई: 'लिव्ह इन रिलेशनशिप' नात्यातून बाहेर पडताना मानसिक वेदना होतात. नात्याचा मनावर खोलवर परिणाम झाला असल्यामुळे जवळच्या लोकांची, तज्ज्ञांची गरज भासू लागते. त्यावेळेस आजूबाजूला सल्ला देणारे योग्य आहे की, नाही हे तपासून घ्यावे. नाहीतर स्वतःहून मानसोपचारतज्ज्ञाकडे जाऊन सल्ला घ्यावा. अशा नात्यातून स्वतःला वेगळे करणे सर्वांत उत्तम असेल.

कुटुंबाला विश्वासात घ्या : सहमतीने एकत्र राहण्याची पद्धत सुरू झाली आहे. त्याला नाव दिले 'लिव्ह इन रिलेशनशिप'; पण या रिलेशनशिपमध्ये असे गुन्हेगार का घडत आहेत, याचा कोणी विचार केला आहे का? या नात्यात आपण राहिल्यावर नातेवाईक तुटतात. इतरंपासून आपण दूर जातो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या नात्याबद्दल आपण कोणाशीच स्पष्ट बोलत नाही. मोकळेपणाने संवाद साधत नाही हा 'लिव्ह इन रिलेशनशिप'चा तोटा आहे. समाजाने या नात्याला अजून मोठ्या प्रमाणात मान्यता दिलेली नाही. 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या लोकांनी आई-वडिलांना सोडलेले असते. त्यामुळे त्यातून पुढे अनेक गुन्हे घडत असतात. अन्याय झालेल्यांना कुठे न्याय मागण्यात अडचणी येतात. अशा प्रकारच्या नात्यात कोणी स्वतःला अडकवून घेऊ नये. कुटुंबीयांना विश्वासात घेऊन आपण लग्न करावे आणि एकत्र राहावे, असे मत जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक मिलिंद पोंक्षे यांनी व्यक्त केले.


कुटुंबात सुसंवाद राखा : 'लिव्ह इन रिलेशनशिप' बद्दल आणि त्यानंतर घडलेले प्रकार आपण न्यूजच्या माध्यमातून दररोज ऐकतोय. काही समाजाला धक्का देणारे प्रकार देखील घडतात. नेमके हे प्रकार का घडतात याचा जर विचार केला तर आपल्याला अनेक कारणे मिळतील. एकत्रित कुटुंब पद्धती विस्कळीत होत चालली आहे. तरुण पिढी कुटुंबात आता स्वावलंबी झाली आहे. पर्यायी जीवन जगण्यासाठी समाजातील काही लोक तरुण पिढीला प्रवृत्त करत असतात. ज्या विकृत गोष्टी घडतात त्याला देखील अनेक कारणे आहेत. समाजातील आपले महत्त्व कमी होणार, आपल्यावर आपल्या लोकांचा विश्वास कमी होणार, आपल्या लोकांमधील ताळमेळ कमी होणार ही कारणे यासाठी कारणीभूत ठरू शकते.

अघटित रोखण्यासाठी 'हे' करा : कुटुंबातील आपले महत्त्व टिकवून ठेवले पाहिजे. आपल्या कुटुंबांमधील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ देऊ नये. कुटुंबात आपल्या मुला-मुलींसोबत कायम संवाद करीत रहा. कोणालाही एकटे पडू देऊ नका. कारण यानंतर ते विकृत लोकांच्या नजरेत पडले तर त्यांचे बळी पडू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत सुसंवाद सतत चालू ठेवा. अशा प्रकारचे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रसन्ना तेंदोलकर यांनी केले आहे.

एकटेपणा टाळण्यासाठी 'हे' करा: 'लिव्ह इन रिलेशनशिप'च्या नात्यात बळी पडलेल्या अनेक मुली, महिला समोर येत आहेत. त्यामुळेच पुढे अनेक विकृत घटना घडत असतात. गेल्या वर्षी झालेल्या श्रद्धा वालकर तरुणीची हत्या आणि मीरा भाईंदर मध्ये घडलेली तरुणीची क्रूर हत्या मन हेलावून टाकणारी आहे. अशा घटना थांबविण्यासाठी आपापल्या कुटुंबात सुसंवाद राखला जावा. यामुळे 'लिव्ह इन रिलेशनशिप'ला चाप बसू शकतो. त्यामुळे आपल्या आई-वडिलांसोबत, पती-पत्नीसोबत मोकळे बोलणे भविष्यासाठी फायद्याचे असणार आहे.

हेही वाचा:

  1. Mira Road Murder: श्रद्धा वालकरपेक्षा भयानक सरस्वती वैद्य हत्याकांड, शंभरहून अधिक तुकडे शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले...
  2. Live In Relationship: 'लिव्ह इन रिलेशनशिप' काय आहेत अटी? कायदा काय म्हणतो?
  3. Kolhapur Clashes: शहरातील सीसीटीव्ही तपासून पोलीस पुढील कारवाई होणार -कोल्हापूर पोलीस अधीक्षक
Last Updated :Jun 8, 2023, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.