मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Summons Param Bir Singh ) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. अनुप डांगे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत चौकशी करण्यासाठी ११ जानेवारीला हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. पण, त्यांनी कोरोनाचे कारण देत दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला होता. त्यानुसार त्यांना २ फेब्रुवारीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.
काय होता परमबीर सिंहवर आरोप - या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केली जात होती. मात्र, वर्षभर या प्रकरणाची चौकशी सुरू असूनही काही निकाल न लागल्यामुळे अनुप डांगे यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. मात्र, आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी गेल्यावर्षी गृहविभागाचे अपर मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांचे पब मालकाशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी वर्षभरानंतरही कोणतीही प्रगती न झाल्यामुळे डांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. डिसेंबरमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना डांगे यांनी पत्र लिहून हे प्रकरण सीबीआय वर्ग करण्याची मागणी केली होती.
काय आहे प्रकरण - या घटनेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक असताना परमबीर सिंह यांनी कोणताही संबंध नसतानाही त्यांना एसीबी कार्यालयात बोलावले होते. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी तेथे जाण्याची परवानगी दिली नाही. फेब्रुवारी, 2020 मध्ये परमबीर सिंह मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी जीतू नवलानी याच्या सांगण्यावरून डांगे यांना नियंत्रण कक्षात बदली केल्याचा आरोप या पत्रात केला होता. सिंह यांच्या अंडरवर्ल्डसोबत असलेल्या संबंधांबाबतची चौकशी करण्याची मागणीही केली होती. 2 फेब्रुवारी, 2021 मध्ये करण्यात आलेल्या या तक्रारीला वर्ष होत आले असतानाही त्याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. त्याबाबत नाराजी व्यक्त करत डांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता याप्रकरणाची चौकशी सीआयडीकडे वर्ग करण्यात आली आहे.