ETV Bharat / state

Political Crisis In NCP : १९७८ साली काकांनी केलेल्या बंडाची पुतण्याने केली पुनरावृत्ती

author img

By

Published : Jul 4, 2023, 10:34 PM IST

Updated : Jul 4, 2023, 10:48 PM IST

अजित पवारांच्या बंडखोरीने राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप घडवून आणल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. अजित पवारांच्या धक्कादायक निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या बंडाची आठवण होत आहे. १९७८ साली अशाच पद्धतीने शरद पवारांनी बंड केले होते. चार दशकांपूर्वी शरद पवारांनी केलेल्या बंडाची पुनरावृत्ती अजित पवारांनी करुन दाखवली आहे. त्यामुळे काका पुतण्याच्या बंडाची चर्चा देशभरात चांगलीच रंगली आहे.

Political Crisis In NCP
Political Crisis In NCP

मुंबई : राज्यातले राजकारण गेल्या ३ दिवसांपासून ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण होत असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी बंड केले. अजित पवारांनी केलेल्या बंडाने १९७८ सालच्या बंडाचा इतिहासाची पुन्हा एकदा पुनारावृत्ती झाली आहे. याला १९७८ नंतर झालेल्या बंडाचा पार्ट टू म्हणायला काही हरकत नाही आहे. तेव्हाच्या, तसेच आताच्या बंडात एक महत्वाचे साम्य आहे. देशाच्या राजकारणात जाणते राजा म्हणून नावलौकिक असणारे किंगमेकर, शरद पवार हे १९७८ च्या बंडात प्रमुख भूमिकेत होते, तर आताच्या बंडात त्यांचे पुतणे ज्येष्ठ नेते अजित पवार हे प्रमुख भूमिकेत आहेत. थोडक्यात काका- पुतण्याच्या जोडीने केलेले बंडाची देशासह राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

काळ बदलला खेळ तोच? : असे म्हणतात की, राजकारणात कुणी कुणाचे नसते. गेले तीन दिवस जे राजकीय नाट्य महाराष्ट्रात घडते आहे. ज्याची चर्चा देशभरात होत आहे. असे नाट्य खरंतर या राज्याला नविन नाही. पूर्वीही एकदा १९७८ साली अगदी हेच नाट्य या राज्याने पाहिले आहे. राज्यात पहिल्यांदा झालेले चकीत करणारे बंड या राज्याने अनुभवले आहे. योगायोगाची गोष्ट अशी आहे की, चार दशकांपूर्वी बंडाच्या केंद्रस्थानी असणारी व्यक्ती ही आज दुसर्‍या बाजूला आहे. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून देशातल्या राजकारणात नेहमी मुख्य प्रवाहात असणारी, ज्यांच्याशिवाय राजकारणाची कुठलीही खेळी पूर्ण होऊ शकत नाही असे व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार. आज काळ बदलला असला तरी खेळ तोच आहे. आज राज्यात जे काही बंडाचे राजकारण सुरू आहे त्याची सुरुवात खुद्द शरद पवार यांनीच केल्याची जाहीर कबुली अनेकजण देत आहेत. आजही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याचा पुनरुच्चार केला आहे. १९७८ साली शरद पवारांच्या बंडखोरीने देशात राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. देशातले पहिले बंड त्यावेळी जनतेने पाहिले होते. काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना सत्तेतून पाय करायला लावून जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांच्या मदतीने शरद पवारांनी सत्ता काबीज केली होती.

१९७८ ला शरद पवारांनीच बंडखोरीची सुरवात केली होती, त्याचेच फळ शरद पवारांना मिळाले. जो प्रकार झाला तो अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. कोणी राज्यात जर जनमत घेतले, तर प्रत्येक घरातून शिव्या ऐकायला मिळतील. हा मतदारांचा घोर अपमान आहे. - राज ठाकरे

पुरोगामी लोकशाही दल चा प्रयोग : १९७५ साली देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर १९७७ मध्ये आणीबाणी संपुष्टात आली. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदाचे रूपांतर दोन गटात झाले. इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे काँग्रेसचे दोन गट तयार झाले. शरद पवार हे त्यावेळी रेड्डी काँग्रेससोबत होते. शंकरराव चव्हाण यांनी त्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचा महाराष्ट्र समाजवादी पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर १९७८ मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. जनता पक्षाने सर्वाधिक ९९ जागा जिंकल्या. तर इंदिरा काँग्रेसने ६५ आणि रेड्डी काँग्रेसने ६९ जागा जिंकल्या. रेड्डी काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री तर इंदिरा काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले. १८ जुलै १९७८ ला संयुक्त महाराष्ट्रातील पहिले आघाडी सरकार म्हणून हे अस्तित्वात आले. पवारांची समाजवादी काँग्रेस या सोबत शेकाप, जनता पक्ष, कम्युनिस्ट पक्ष यामध्ये सहभागी झाले. शरद पवार या सरकारमध्ये उद्योगमंत्री होते. परंतु काही दिवसानंतरच या दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोप, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका सुरू झाली. या सर्व प्रकाराला वसंतदादा फार कंटाळले होते. त्यानंतर शरद पवारांच्या माध्यमातून वसंतदादा, यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. पवारांनी ३५ आमदारांच्या पाठबळावर पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) चा प्रयोग करून महाराष्ट्रातील सर्वात तरूण म्हणजे वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री होण्याचा पराक्रम केला. शरद पवारांचे हे बंड देशभर गाजले होते.

चार दशका नंतरचे पुतण्याचे बंड : आता तब्बल चार दशकांनंतर शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी बंड पुकारल्याने आधी काका, पुतण्याच्या बंडाची चर्चा रंगली आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडांची आग शांत होत नाही तोच अजित पवार यांनी केलेल्या बंडाने महाराष्ट्राच्या राजकीय बंडात आणखी एक भर पडली आहे. २०१९ मध्येच अजित पवारांनी तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन या बंडाचा ट्रेलर दाखवला होता. परंतु राजकारणात कसलेल्या त्यांच्या काकांनी अर्थात शरद पवार यांनी तो बंड मोडीत काढला होता. पण, तेव्हाचा हा राजकीय चित्रपट अजित पवारांनी यंदा पूर्ण केला आहे. २ जुलै २०२३ रोजी जवळपास ३० आमदारांचा पाठिंबा घेत अजित पवार शिंदे - फडणवीस सरकारमध्ये दाखल झाले आहेत. या अगोदर पक्षात आपली घुसमट होत असल्याची अप्रत्यक्ष कबुली त्यांनी अनेकदा दिली आहे. अजित पवार भाजप सोबत गेलेच नाहीत तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. देशात त्यांचेच नेतृत्व प्रबळ विकासाच्या मुद्द्यावर आपण त्यांना साथ दिली असल्याचे ते सांगत आहेत.

इतिहासाची पुनरावृत्ती : एकीकडे देशात भाजप विरोधात सर्व पक्ष एकवटले असून त्याच्या नेतृत्वाची धुरा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. असे असतांना दुसरीकडे पक्षात उभी फूट पाडून आपल्या घरातच शरद पवारांना कमजोर करण्याचे काम अजित पवारांनी केले आहे. इतकेच नाही तर, आपल्या सोबत शरद पवारांच्या अत्यंत जवळची, विश्वासातील नेते मंडळी प्रफुल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांनाही त्यांनी बरोबर घेतले आहे. अजित पवार यांच्या या बंडाने शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना दगा दिला, त्यांना संकटात आणले अशी विशेषणे लावली जात असताना १९७८ साली शरद पवारांनी पुलोदचे सरकार स्थापना करतांना वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना दगा दिला, त्यांना संकटात आणले अशीच विशेषणे लावली गेली होती. शेवटी म्हणतात ना, कधी ना कधी इतिहासाची पुनरावृत्ती होत असते.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडानंतर कोणाकडे किती आमदार?; वाचा सविस्तर

Last Updated : Jul 4, 2023, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.