ETV Bharat / state

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; औसा तालुक्यातील धक्कादायक घटना

author img

By

Published : Dec 17, 2020, 10:16 PM IST

लातूर
लातूर

पती-पत्नीतील भांडणे विकोपाला गेल्यावर काय होते? याचा प्रत्यय औसा तालुक्यातील आशिव येथे आला आहे. सातत्याने होणाऱ्या भांडणातून पतीने पत्नीचा खून केला तर स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

लातूर - तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे महादेव पारधे हा पत्नी आणि पाच मुलांसोबत वास्तव्यास होता. मात्र, सातत्याने होणाऱ्या भांडणामुळे पत्नी अनुराधा ही माहेरी औसा तालुक्यातील आशिव येथे राहत होती. याच दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा महादेव (वय 45) याने सासरी येऊन पत्नीची गळा चिरून हत्या केली तर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील महादेव पारधे यांचा काही वर्षांपूर्वी औसा तालुक्यातील आशिव येथील अनुराधा यांच्याशी विवाह झाला होता. महादेव हा हमाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र, या दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. पारधे दाम्पत्याला पाच मुलं असतानाही या दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याने दोन वर्षांपासून अनुराधा ह्या माहेरी आशिव येथे राहत होत्या. बुधवारी रात्री उशिरा महादेव हा माहेरी आला. या दोघांमध्ये टोकाचा वाद झाला आणि यामध्येच महादेवने गळा चिरून पत्नीची हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. भादा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिकचा तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.