कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील दत्तवाडमध्ये चार कुत्र्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला आहे. सकाळी आठ वाजता ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर चार कुत्र्यांनी हल्ला केला असून यामध्ये सातगोंडा नुले (वय 55, रा. दत्तवाड) या शेतकऱ्याला गंभीर जखमी केले आहे. गेल्या महिन्याभरापासून दत्तवाडमधील मोकाट कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणात दहशद माजवली आहे. यामध्ये 2 शेतकऱ्यांसह एका जनावराचा मृत्यू झाला आहे तर अनेकांना गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने वाचला जीव
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी शेतकऱ्यांने मोठमोठ्याने ओरडून आजूबाजूच्या नागरिकांना जमा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शेतकऱ्याचा आरडाओरड कानी पडताच कुमार पाटील या तरुणाने जीवाची पर्वा न करता कुत्र्यांच्या तावडीतून शेतकऱ्यास वाचवले. आरडाओरड केल्याने सातगोंडा नुले यांचा आज जीव वाचला. मात्र कुत्र्याचा हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
ठारच मारण्याची गावकऱ्यांमधून मागणी
गेल्या महिन्याभरापासून दत्तवाडसह परिसरात मोठ्या प्रमाणात दहशद निर्माण केली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून कुत्र्यांना पकडू नका, त्यांना ठारच मारा, अशी मागणीही होऊ लागली आहे. दरम्यान, या मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त नाही केल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा स्थानिकांनी दिला आहे.
महापालिकेकडून कुत्री पकडायला गेलेल्या कर्मचाऱ्यावरही हल्ला
दरम्यान, कुत्र्यांची दहशत पाहून कुत्रे पकडणारी काही पथकेदेखील गावात दाखल झाली आहेत. अनेक कुत्र्यांना त्यांनी पकडले सुद्धा आहे. मात्र या पथकातील काही कर्मचाऱ्यांना कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले आहे.