बदनापूर (जालना) - जालना औरंगाबाद महामार्गवर दावलवाडी फाटा येथे आज दुपारी २ वाजेच्या सुमारास कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कंटनेर, दुचाकीचा भीषण अपघात
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जालना - औरंगाबाद महामार्गवर जालन्याकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कंटेनरने (क्रमांक एम एच २१ बी एच ३३१६) दुचाकीला (क्रमांक एम एच २१ बी सी ५६०) जोराची धडक दिली. या अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अक्षय सारंगधर जाधव (वय २१) व वैभव दत्तात्र्य चव्हाण (वय २०) दोघेही राहणार दावलवाडी अशी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. दरम्यान पोलिसांनी कंटेनर जप्त केला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली.