जालना : हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर विशिष्ठ धर्माच्या लोकांना टारगेट केले जात असल्याची टीका विरोधकांनी केली. त्याला उत्तर देताना केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, "धर्मावर राजकारण चालत नाही. एखाद्याने चुकीचे काम केले असेल तर त्याच्याबद्दल तक्रार आली असेल तर त्याची चौकशी कोणीही रोखू शकत नाही. अशा प्रकारच्या या ईडी व सीबीआयच्या चौकशा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या लोकांवरच होत आहे असे नाही." भारतीय जनता पार्टी जिल्हा जालना यांच्या वतीने आज नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
चौकशीला विरोध करणे चुकीचे : ते पुढे म्हणाले की, जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो, तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे देखील असा कारवाईचा ससेमिरा लावला होता. मात्र, आपण काही गुन्हा केला असेल तर सिद्ध करून दाखवावा. परंतु गुन्हा करायचा आणि चौकशी सुरु झाली की त्याला विरोध करायचा हे चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आगामी निवडणूकीत भाजप जिंकेल : जालना जिल्ह्यातील 167 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या असून आगामी निवडणुकातही भाजपलाच बहुमत मिळेल. जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील 167 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात असून उर्वरित इतर राजकीय पक्षाच्या ताब्यात असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
हेही वाचाः Hasan Mushrif : ईडीचे अद्याप आपल्याला एकही समन्स नाही, केवळ कुटुंबीयांना नाहक त्रास - हसन मुश्रीफ
प्रतिमा निर्माण करा : ग्रामपंचायत निवडणूकीतील नवनिर्वाचित सरपंचा सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते म्हणाले की, नवनियुक्त सरपंचांनी गावाचा विकास करण्यापूर्वी गावात स्वतःची प्रतिमा तयार करा आणि मग विकास कामांना सुरूवात करा. तसेच निवडणूकीतील पूर्वागृह दूर करून सर्वांसोबत संगनमताने गावाचा विकास करा. गावातील जुने वाद विसरले पाहिजे. गावातील प्रत्येक नागरिकाला गावातील सरपंचाचा अभिमान वाटला पाहिजे, यामुळे तुमची अगोदर प्रतिमा तयार करा. कारण विकासापेक्षा तुमचे वागणे, बोलणे आणि तुमचा व्यवहार यावर गावाची लोकप्रियता अवलंबून आहे, असेही ते म्हणाले.