ETV Bharat / state

साकेगावातील सासू आणि सून वाघूर नदीत गेली वाहून; धरणातून पाणी सोडल्याने घडली दुर्घटना

author img

By

Published : Jul 30, 2020, 11:47 AM IST

Updated : Jul 30, 2020, 3:24 PM IST

साकेगाव येथील वाघूर नदीत वाळू चाळण्यासाठी नात्याने सासू आणि सून असणाऱ्या दोन महिला गेल्या होत्या. धरणातून पाणी सोडल्यामुळे अचानक नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने वाळू सोबत दोघी वाहून गेल्या.

Two ladies carried away in waghur river
वाघूर नदीत दोन महिला गेल्या वाहून

जळगाव- वाघूर धरणातून पाणी सोडल्याने वाघूर नदीला आलेल्या पुरात दोन महिला वाहून गेल्या. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील रेल्वे पुलाजवळ घडली आहे. सिंधूबाई अशोक भोळे (वय 65) आणि योगिता राजेंद्र भोळे (वय 35) अशी पुरात वाहून गेलेल्या महिलांची नावे आहेत. दोघी नात्याने सासू-सून असून, त्या साकेगाव येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने नदीपात्रात त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

साकेगावातील सासू आणि सून वाघूर नदीत गेली वाहून

या घटनेसंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधूबाई भोळे व त्यांची सून योगिता भोळे या दोन्ही साकेगावातील मशिदीच्या मागे राहत होत्या. दोघींच्या पतींचे निधन झाल्याने त्या मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या वाघूर नदीपात्रात वाळू गाळण्याचे काम करत होत्या. गुरुवारी सकाळी देखील त्या वाळू गाळण्याच्या कामासाठी नदीपात्रात गेल्या होत्या. त्या सकाळी नदीपात्रात गेल्या तेव्हा वाघूर नदीला फारसे पाणी नव्हते. मात्र, बुधवारी रात्रीच्या वेळी वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने गुरुवारी सकाळी धरणाचे 2 दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. तत्पूर्वी सिंधुबाई व योगिता भोळे या नदीपात्रात काही दिवसांपूर्वीच बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या वरील बाजूस गेलेल्या होत्या.

दरम्यान, धरणातून पाणी सोडल्यामुळे अचानक नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे दोन्ही घाबरल्या. पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्या मदतीसाठी आरडाओरडा करू लागल्या. त्यांचा आवाज ऐकून रेल्वे पुलाजवळ असणार्‍या काही लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघी नदीच्या मधोमध अडकल्याने त्यांना वाचवता आले नाही. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने वाळूच्या ढीग सोबत दोघी वाहून गेल्या. या घटनेची माहिती साकेगावसह पंचक्रोशीत पसरल्यानंतर महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर दोघींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले.

अवैध वाळू उत्खननाचा प्रश्न ऐरणीवर-

या घटनेनंतर वाघूर नदी पात्रातील अवैध वाळू उत्खननाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवैध वाळू उत्खननामुळे वाघूर नदीत मोठे खड्डे पडले आहेत. आता नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने सिंधुबाई व योगिता भोळे या अशाच एखाद्या मोठ्या खड्ड्यात अडकल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दोघी कोणत्या वाळू व्यावसायिककडे वाळू गाळण्याचे काम करत होत्या? याची चौकशी सुरू असल्याचेही समजते. या घटनेप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आलेली नव्हती.

Last Updated :Jul 30, 2020, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.