जामनेर तालुक्याला अतिवृष्टीचा फटका; अनेक गावे पाण्याखाली, कांग नदीच्या पुरात तरुण बेपत्ता

author img

By

Published : Sep 7, 2021, 7:57 PM IST

Updated : Sep 7, 2021, 9:18 PM IST

jamner rain

जामनेर तालुक्यातील 17 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे हानी झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नुकसानीचे प्राथमिक पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. जामनेर तालुक्यातील हिंगणे गावातील सुमारे 20 घरांची पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. ओखर खुर्द आणि ओझर बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये प्रत्येकी 40 घरांची पत्रे उडाली आहेत. रामपूर येथे 10 तर लहासर येथे 15 घरांची पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे.

जळगाव - जिल्ह्यातील जामनेर तालुक्याला सोमवारी (6 सप्टेंबर) रात्री वादळ-वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. आज (मंगळवारी) सकाळपासून देखील पाऊस सुरूच असून, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. शेतांमध्ये पिके पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांवरची पत्रे उडून गेली तर काही घरांची पडझड झाली आहे. रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, कांग नदीला आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेला आहे.

मुसळधार पावसामुळे झालेली दृश्ये

17 गावांमध्ये झाली मोठी हानी -

जामनेर तालुक्यातील 17 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे हानी झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नुकसानीचे प्राथमिक पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. जामनेर तालुक्यातील हिंगणे गावातील सुमारे 20 घरांची पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. ओखर खुर्द आणि ओझर बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये प्रत्येकी 40 घरांची पत्रे उडाली आहेत. रामपूर येथे 10 तर लहासर येथे 15 घरांची पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. ढालशिंगी येथे 4 घरांची अंशत: पडझड झाली असून, जुनोने येथे एका घराची भिंत कोसळली आहे. तळेगाव आणि पहूर येथे अनुक्रमे 9 आणि 8 दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे. टाकळी बुद्रुक येथील पेट्रोल पंपाची पत्रे उडाली आहेत. या सर्व गावांमध्ये सुमारे 130 घरांची पत्रे उडाली आहेत. यासोबतच मेणगाव, टाकळी बुद्रुक, हिरवखेडा दिगर, देवळसगाव, वडगाव तिघ्रे, वाघारी आणि या गावांच्या शिवारातील पिकांचे वादळ आणि मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील भागदरा, तळेगाव, तोंडापूर व ओझर या गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.

उंबर, कांग नद्यांना पूर -

जामनेर तालुक्यातील उंबर आणि कांग नदीला मोठ्या पूर आला आहे. वादळी वाऱ्यामुळे भागदरा गावामधील अनेक घरांवरील पत्रे उडाली असून, उंबर नदीचे पाणी भागदरा गावात शिरले आहे. गावाजवळ असलेला पाझर तलाव देखील फुटल्याने गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रस्ते देखील वाहून गेले आहे. त्यामुळे गावातील काही भागाचा संपर्क तुटला आहे.

हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस; नद्या, नाल्यांना पूर... पाहा व्हिडिओ

कांग नदीच्या पुरात तरुण बेपत्ता -

कांग नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नदीच्या काठावर गेलेल्या तरुणाचा पाय घसरल्यामुळे तो पुराच्या पाण्यात वाहून गेला. ही घटना आज दुपारी घडली. शेख मुशीर शेख जहीर (वय 32) असे तरुणाचे नाव आहे. या तरुणाचे शोध कार्य सुरू आहे. घटनेची माहिती जामनेरचे तहसीलदार यांना मिळताच त्यांनी तातडीने मंडळ अधिकारी आर. के. चौधरी. व तलाठी शिवाजी काळे, पोलीस हवालदार देशमुख यांना घटनास्थळी पाठवले. तोंडापूर येथील कांग नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. आजूबाजूच्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

तळेगावात अनेक संसार पाण्यात -

तळेगावसह परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नद्या व नाले वाहू लागले आहेत. तळेगाव येथील नदीला मोठा पूर आल्याने बसस्थानक परिसरातील घरे व दुकाने पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात देखील पाणी घुसल्याने ग्रामपंचायतीचे दप्तर ओले झाले आहे. तळेगाव, शेळगाव, कासली व सावरला परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सुधाकर भिवसन हिवाळे, सुपडाबाई समाधान कांबळे, कडुबा कोळी तसेच मन्यार कुटुंबीयांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून नुकसान झाले आहे. बसस्थानक परिसरातील हॉटेल, दुकान, पान टपऱ्यांमध्ये पाणी शिरल्याने सामान वाहून गेले आहे. सावरला येथील एका महिलेला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जामनेरला नेण्यात येत होते. मात्र, पुरामुळे ही रुग्णवाहिका तळेगाव मध्येच अडकून पडली. त्या महिलेला तळेगाव येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे लागले. तळेगाव परिसरातील विद्युत खांब कोसळल्याने गावाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

प्रशासनाकडून घेतला जातोय परिस्थितीचा आढावा -

दरम्यान, जामनेर तालुक्यातील पूर परिस्थितीचा जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हा आपत्ती निवारण कक्षातर्फे अडचणीत असलेल्या लोकांना मदत केली जात आहे.

Last Updated :Sep 7, 2021, 9:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.