जळगाव - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी ते मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रक कधी व कशाप्रकारे मिळेल? याबाबत बोर्डाकडून कोणत्याही सूचना महाविद्यालयांना देण्यात आलेल्या नाहीत. यंदा कोरोनामुळे दीड महिना उशिराने निकाल जाहीर झाला आहे. त्यातच गुणपत्रकाबाबत अनिश्चितता असल्याने यंदा प्रथम वर्षाचे प्रवेश लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील ४६ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ४२ हजार १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची एकूण टक्केवारी ८९.७२ टक्के इतकी आहे. दरवर्षी बारावी परीक्षेचा निकाल हा मे अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागतो. त्यानंतर ४ ते ५ दिवसांत विद्यार्थ्यांच्या हाती गुणपत्रक दिले जाते. गुणपत्रक मिळताच प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. पण यंदा कोरोनाने थैमान घातल्याने २२ मार्चपासून लॉकडाऊन लावण्यात आला होता. यामुळे प्रथमच बारावीचा निकाल तब्बल दीड महिना उशीरा लागला आहे.
गुणपत्रक वितरणातही धोका
दरवर्षी निकाल लागल्यानंतर आठवडाभरात प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होते. मात्र, अद्याप गुणपत्रकाबाबत कोणताही निर्णय नसल्याने यंदाची प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. त्यातच गुणपत्रक महाविद्यालयात वितरीत केले तर त्यातही कोरोनाच्या संसर्गाचा धोका आहे.