ETV Bharat / state

एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास...

author img

By

Published : Oct 21, 2020, 1:18 PM IST

Updated : Oct 21, 2020, 1:42 PM IST

एकनाथ खडसेंची २००९मध्ये महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. २०१४मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेवर भाजपा निवडून आली, तेव्हा खडसे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते; परंतु देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. खडसे हे महाराष्ट्राचे महसूलमंत्री, कृषीमंत्री, राज्य उत्पादनशुल्कमंत्री बनले. २०१४ ते २०१६ या काळात एकनाथ खडसे १२ खात्यांचे मंत्री होते.

EKNATH KHADASE NEWS
EKNATH KHADASE NEWS

जळगाव - भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी राजकीय जीवनाची सुरुवात कोथळी गावामध्ये सरपंचपदापासून केली. १९९०मध्ये ते मुक्ताईनगर तालुक्यातून विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिले व ते निवडून आले. १९८९-१९९० विधानसभा निवडणुकीत एदलाबाद (आताचे मुक्ताईनगर) विधानसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे २ हजार ६७२ मतांनी निवडून आले होते. तेव्हापासून ते मुक्ताईनगर तालुक्यातून विधानसभेसाठी अपराजित राहिले आहेत. १९९५ ते १९९९ च्या काळात भाजपा-शिवसेना युती सरकारमध्ये खडसे पाटबंधारे व अर्थमंत्री राहिले आहेत.

मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

एकनाथ खडसेंची २००९मध्ये महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. २०१४मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेवर भाजपा निवडून आली, तेव्हा खडसे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. खडसे हे महाराष्ट्राचे महसूलमंत्री, कृषीमंत्री, राज्य उत्पादनशुल्कमंत्री बनले. २०१४ ते २०१६ या काळात एकनाथ खडसे १२ खात्यांचे मंत्री होते. २०१६मध्ये खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. २०१९च्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर हिला भाजपाने तिकीट दिली. जळगाव शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपा, रोहिणी खडसे विरुद्ध अपक्ष अर्ज भरला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाठिंबा दिला व 'चंद्रकांत पाटील' यांनी रोहिणी एकनाथ खडसे (भाजपा) यांचा १९८९ मतांनी पराभव केला.

फडणवीस आणि महाजनांवर आरोप

एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जामनेरचे आमदार व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले. गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आपले तिकीट कापले गेल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी वारंवार केला. आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा कट रचला गेला, असाही आरोप त्यांनी केला. एकनाथ खडसे विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी उत्सुक होते. त्यांना उमेदवारी देण्यात यावी, म्हणून त्यांनी भाजपाकडे मागणी केली होती. परंतु त्यांना डावलण्यात आले. म्हणून त्यांनी वृत्तवाहिन्यांवर नाराजी व्यक्त केली.

विधानसभेतील उल्लेखनीय कामगिरी

एकनाथ खडसेंनी महाराष्ट्रातील ज्वलंत विषय विधानसभा अधिवेशनापर्यंत पोहोचविले. त्यांच्या उल्लेखनीय अशा वक्तृत्वाने त्यांनी नेहमीच अधिवेशनात छाप पाडली.. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न ते सदैव करत असत. २९ मार्च २०१७ला अर्थसंकल्पाच्या विविध चर्चांमध्ये त्यांनी सत्तेत भाजपा असूनसुद्धा सरकारला धारेवर धरले. त्याचवेळी विधानसभेत शेतकऱ्यांचा प्रश्न ऊर्जामंत्र्यांसमोर व मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. सरकारला जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला पाणी द्यायला वीज मिळत नाही, असे खडसेंनी सांगितले. निवडणुकीत जनतेला आश्वासन दिले होते की, २४ तास वीज देऊ, त्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल त्यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांना केला.

राजकीय जीवनातील महत्त्वाचे टप्पे -

१९८८ - कोथळी गावचे सरपंच.

१९९० - मुक्ताईनगरचे आमदार

१९९७ - भाजपा-शिवसेना युती सरकारमध्ये पाटबंधारेमंत्री

२०१० - विरोधी पक्षनेतेपदी निवड

२०१४ - भाजपा सरकारमध्ये महासूलमंत्री, कृषीमंत्री, अल्पसंख्याकमंत्री, उत्पादन शुल्कमंत्री

२०१६ - महसूलमंत्रीपदावरून राजीनामा

Last Updated :Oct 21, 2020, 1:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.