ETV Bharat / state

भुसावळात डंपरने दुचाकीला उडवले; नातेवाईकाच्या लग्नाला जाताना बुलढाण्यातील दाम्पत्यावर काळाचा घाला

author img

By

Published : Dec 4, 2020, 4:56 PM IST

DIED COUPLE
मृत दाम्पत्य

वराडे दाम्पत्य काल (गुरुवारी) आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी भुसावळात आलेले होते. त्यांच्या नातेवाईकाचे आज (शुक्रवारी) लग्न होते. लग्नासाठी भुसावळ शहरातील विवाहस्थळी ते आपल्या (एमएच 28, एसी 6671) क्रमांकाच्या मोपेड दुचाकीने जात होते.

जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ शहरातील खडका चौफुलीवर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला उडवल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात आज (शुक्रवारी) सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडला. ते दुचाकीने भुसावळात आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी येत होते. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. चंद्रकांत वराडे (वय 62) आणि संध्या वराडे (वय 58) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. मृत दाम्पत्य बुलडाणा शहरातील चिखली रोड परिसरातील रहिवासी होते.

dumper-bike accident in bhusawal, husband wife died on the spot
अपघातग्रस्त वाहन आणि मृत दाम्पत्य.

डंपरच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू -

वराडे दाम्पत्य काल (गुरुवारी) आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी भुसावळात आले होते. त्यांच्या नातेवाईकाचे आज (शुक्रवारी) लग्न होते. लग्नासाठी भुसावळ शहरातील विवाहस्थळी ते आपल्या (एमएच 28, एसी 6671) क्रमांकाच्या मोपेड दुचाकीने जात होते. त्याचवेळी खडका चौफुलीवर त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच 19 झेड 3192) क्रमांकाच्या डंपरने जोरात धडक दिली. त्यात वराडे दाम्पत्य थेट डंपरच्या चाकाखाली येऊन चिरडले गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारच्या कामावर जनतेचे शिक्कामोर्तब; मंत्री गुलाबराव पाटील

अपघातानंतर डंपर चालक फरार -

अपघात घडल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला. डंपर घटनास्थळी सोडून त्याने पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृत वराडे दाम्पत्याचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चुलत भाच्याचे होते लग्न -

चंद्रकांत वराडे व संध्या वराडे यांच्या चुलत भाच्याचे शुक्रवारी भुसावळात लग्न होते. याच लग्नासाठी ते गुरुवारी आपल्या दुचाकीने बुलढाणा येथून भुसावळात आलेले होते. मात्र, लग्नाला हजेरी लावण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वराडे यांच्या नातेवाईकांनी धाव घेतली होती. नातेवाईकांनी दोघांचे मृतदेह पाहून हंबरडा फोडला. मृत वराडे दाम्पत्याच्या पश्चात मुलगा, मुलगी, नात असा परिवार आहे.

अवैध वाळू वाहतुकीचे मुद्दा ऐरणीवर -

या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवैध वाळू वाहतुकीनेच वराडे दाम्पत्याचा बळी घेतल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू वाहतुकीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. खडका चौफुलीवर महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. महिनाभरात याठिकाणी अपघाताच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.