जळगाव शेतकरी आक्रोश मोर्चा : ठाकरे सरकार नालायक; भाजप नेते गिरीश महाजनांची टीका

author img

By

Published : Nov 1, 2021, 6:52 PM IST

Updated : Nov 1, 2021, 8:00 PM IST

Jalgaon Shetkari Akrosh Morcha
जळगाव शेतकरी आक्रोश मोर्चा ()

यावर्षी शेतकरी अतिवृष्टीमुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले म्हणजे नुसते कागद काळे झाले. मंत्री आले, शेतीतील नुकसान पाहून गेले. शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासने मिळाली. पण एक दमडीचीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही.

जळगाव - अतिवृष्टीमुळे यावर्षी कापूस, केळी, सोयाबीन तसेच कडधान्याचे 100 टक्के नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, ठाकरे सरकारकडून दमडीचीही मदत शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळालेली नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात असताना ठाकरे सरकार मात्र, वसुली, भ्रष्टाचारासह ड्रग्ज, गांज्याच्या नशेत गुंग आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे ठाकरे सरकार नालायक सरकार आहे. असे नालायक सरकार असणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी आज जळगावात केली.

आक्रोश मोर्चा दरम्यान बोलताना भाजप नेते गिरीश महाजन

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात ठाकरे सरकारच्या विरोधात आज (सोमवारी) दुपारी जळगावात भाजपच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भाजप नेते गिरीश महाजन यांनी या मोर्चाचे नेतृत्त्व केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर तेथे जाहीर सभा झाली. या सभेत ठाकरे सरकारला लक्ष्य करताना गिरीश महाजन बोलत होते. मोर्चात भाजपचे खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, संजय सावकारे, चंदू पटेल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी आदींसह जिल्हाभरातील भाजपचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचे कापण्यात आलेले वीज कनेक्शन तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले. शहरातील शिवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

अन्यथा आम्ही बैलगाडी, ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरू -

भाजप नेते गिरीश महाजन पुढे म्हणाले की, यावर्षी शेतकरी अतिवृष्टीमुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले म्हणजे नुसते कागद काळे झाले. मंत्री आले, शेतीतील नुकसान पाहून गेले. शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासने मिळाली. पण एक दमडीचीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. हे सरकार नुसती आपली पाठ थोपटून घेत आहे. आमचे सरकार एक नंबर, आमचे मुख्यमंत्री एक नंबर म्हणवून घेत आहेत. मात्र, प्रत्यक्षात हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. आज शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी तसेच व्यापारी असे सर्वच घटक सरकारवर नाराज आहेत. हे सरकार लायक नाही तर नालायक सरकार आहे, अशी टीका करत गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. आठवडाभरात शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आम्ही आम्ही बैलगाडी, ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरू, असेही त्यांनी सांगितले.

माध्यमांशी बोलताना भाजप नेते गिरीश महाजन

हेही वाचा - VIDEO : नवाब मलिक-देवेंद्र फडणवीसांमध्ये कलगीतुरा; पाहा, मलिकांच्या गंभीर आरोपांवर काय म्हणाले फडणवीस?

पालकमंत्री नाही, तर ते बालकमंत्री - उन्मेष पाटील

शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणणारे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना, कोणत्या बिळात लपले आहेत? असा प्रश्न खासदार उन्मेष पाटील यांनी उपस्थित केला. पालकमंत्री मुळात पालकमंत्री नसून, आता ते बालकमंत्री असल्याची घणाघाती टीका खासदारांनी केली. पेट्रोल दरवाढी विरोधात शिवसेनेचे भामटे सायकल रॅली काढतात. त्या भामट्यांनी आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात रॅली काढावी. ज्यांनी पेट्रोलचा समावेश जीएसटीमध्ये होऊ दिला नाही, अशीही टीका खासदारांनी केली.

पालकमंत्र्यांच्या वाघाची शेळी झाली- मंगेश चव्हाण

पालकमंत्री गुलाबराव पाटील आधी शिंगाडा मोर्चा काढायचे. मात्र, आता पालकमंत्री वाघ नसून ते आता शेळी झाल्याची टीका आमदार मंगेश चव्हाण यांनी केली. तर पालकमंत्री बिना दाताचे वाघ झाले असून, त्यांना शेतकऱ्यांबाबत स्वाभिमान असेल तर पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी दिले. खासदार रक्षा खडसे यांनी देखील राज्य सरकारला धारेवर धरत, शेतकऱ्यांचा प्रश्नावर सरकारवर टीका केली.

Last Updated :Nov 1, 2021, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.