ETV Bharat / state

भीषण पाणीटंचाई; सोईसुविधा असूनही 'या' गावातील नागरिकांना 'पसापसा' पाण्यासाठी हिंडावे लागते 'रानोमाळ'

author img

By

Published : May 27, 2020, 10:59 AM IST

Updated : May 27, 2020, 2:50 PM IST

लॉकडाऊनमुळे सर्वच जण हतबल झालेले आहेत. त्यातच बऱ्याच गावात पाणीटंचाईचे संकट निर्माण झालेले आहे. मात्र ज्या गावात सरकारी विहिरीला तुडूंब पाणी असूनही गावात भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे हातावर पोट असलेले अनेक कुटूंब हैराण आहेत.

wtr
पाण्यासाठी वणवण करणारे नागरिक

हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच जण हतबल झालेले आहेत. त्यातच बऱ्याच गावात पाणीटंचाईचे संकट निर्माण झालेले आहे. मात्र ज्या गावात सरकारी विहिरीला तुडूंब पाणी आहे, गावात जलशुद्धीकरण केंद्र आहे, अशा गावातही भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. आज या विदारक परिस्थितीत ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ येत आहे. शिवाय गावात बाहेरून येणाऱ्या अन् जाणाऱ्यांवर पण ग्रामपंचायतचे अजिबात लक्ष नसल्याचे ग्रामस्थ संगत आहेत. वसमत तालुक्यातील रांजोना असे या गावाचे नाव आहे.

भीषण पाणीटंचाई; सोईसुविधा असूनही 'या' गावातील नागरिकांना 'पसापसा' पाण्यासाठी हिंडावे लागते 'रानोमाळ'

रांजोना या गावची लोकसंख्या तीन हजार असून, कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत शासनाचे नियम पळून ग्रामस्थ घरातच राहून दिवस काढत आहेत. हाताला काम तर नाहीच, त्यामुळे हातावर पोट असलेले अनेक कुटूंब हैराण आहेत. मात्र उसनवारी करून किंवा कुणाचा तरी आधार घेत, चूल पेटविण्याचा प्रयत्न करत आहेत. या गावात राजकीय वातावरण गरम आहे. गावच्या विकासासाठी प्राप्त झालेल्या लाखो रुपयांच्या निधीतून विकास कामे केली आहेत. मात्र मुख प्रश्न निर्माण झालेला आहे, तो पाण्याचा.

सरकारी विहिरीला प्रचंड पाणी आहे. शिवाय ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून, जलशुद्धीकरण देखील बसविण्यात आले आहे. ग्रामस्थांची भटकंती थांबवण्यासाठी दारोदार नळ देखील दिले आहेत. मात्र त्या नळाला एक दोन वेळा वगळता कधीच पाणी आलेले नाही. शिवाय जलशुद्धीकरण केंद्र केवळ बसवल्याचे माहीत झाले. परंतु उन्हाळा संपत आला असला, तरी अजून शुद्ध पाणी पिण्याची संधी मिळालेली नसल्याचे ग्रामस्थ मोठ्या पोट तिडकीने सांगत आहेत.

विहिरीवर दोन सरकारी मोटारी बसविण्यात आलेल्या आहेत. त्या देखील चोरी गेल्याचे सांगितले जाते. मग नेमके सरपंच ग्रामसेवकाचे लक्ष आहे, तरी कशावर? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सोलार प्लेट देखील बसण्यात आली. मात्र तिचा उपयोग गावाला नव्हे, तर शेताला पाणी देण्यासाठी केला जात असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

कोरोना सारखा महाभयंकर काळ सुरू असला, तरीही ग्रामपंचायतीला बाहेर गावावरून कोण येते, अन् कोण जाते, याची देखील साधी कल्पना राहत नाही. या बिनधास्त वागणाऱ्या ग्रामपंचायतीमुळे कोरोना आहे की नाही, हे देखील कळायला मार्ग नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. एकंदरीत ग्रामपंचायतीच्या या बेजबाबदारपणामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी करूनही काही उपयोग होत नसल्याने, ग्रामस्थ हतबल झालेले आहेत. निदान आता तरी या ग्रामस्थांना पाण्याची व्यवस्था होईल हीच अपेक्षा.

Last Updated :May 27, 2020, 2:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.