ETV Bharat / state

रेल्वे ट्रॅकवरील वन्यजीवांचे मृत्यू कमी होणार? वनविभागानं दिला रेल्वेला अहवाल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 10:16 PM IST

Updated : Nov 28, 2023, 10:30 PM IST

Tigress dies In Train Collision : चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत एका तीन महिन्याच्या वाघिणीचा मृत्यू झाला होता. त्यावर वनविभागानं उपाययोजना करण्यासाठी रेल्वे विभागाला अहवाल पाठवला आहे. त्यामुळं रेल्वे ट्रॅकवरील वन्यजीवांचे मृत्यू कमी होण्याची शक्यता आहे.

Tigress dies in train collision
Tigress dies in train collision

डॉ. जितेंद्र रामगावकर यांची प्रतिक्रिया

चंद्रपूर Tigress dies In Train Collision : चांदा फोर्ट ते गोंदिया रेल्वे मार्ग हा वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत आहे. कालच रेल्वेच्या धडकेत एका तीन महिन्यांच्या वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्यानं हा मुद्दा पून्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळं याबाबत उपाययोजना करण्यासाठी वनविभागानं रेल्वे विभागाकडं अहवाल पाठविला आहे. याबाबत रेल्वे प्रशासनानं देखील अनुकूलता दाखवली आहे.

रेल्वेच्या धडकेत वन्यजीवांचा मृत्यू : चंद्रपूर जिल्हा हा घनदाट जंगलाने वेढलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक जंगल असलेला हा जिल्हा आहे. चंद्रपूरच्या बाबपेठला चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन आहे. इथंच नागभीड ते गोंदिया रेल्वे मार्ग आहे. हा मार्ग चंद्रपूर, मूल, सिंदेवाही, नागभीड तालुक्याला जोडतो. या रेल्वे मार्गाच्या दुतर्फा घनदाट जंगल आहे. येथे वन्यजीवांचा मुक्तसंचार आहे. वाघ, बिबट, हरण, रानगवा, रानडुक्कर आदी वन्यजीवांचा यात समावेश आहे. रेल्वे मार्ग ओलांडत असताना अनेकदा रेल्वेच्या धडकेत वन्यजीवांचा मृत्यू होतो. हा एक गंभीर विषय आहे.

पाच वर्षांत 6 वाघ 2 बिबट्यांचा मृत्यू : 2018 पासून 2023 पर्यंत चंद्रपूर येथील रेल्वे मार्गावरील अपघातात तब्बल सहा वाघांसह 2 बिबट्यांचा मृत्यू झाला. नोव्हेंबर 2018 मध्ये लोहाराच्या जंगलात रस्ता ओलांडत असताना तब्बल तीन वाघांच्या बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर वाघीण देखील जखमी झाली होती. त्यानंतर 8 ऑक्टोबर 2019 मध्ये सावली चिखली मार्गावर एका बिबट्याचा मृत्यू झाला. 10 ऑगस्ट 2022 ला राजुरा तालुक्यातील चनाखा येथे रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला होता. तसंच 21 ऑक्टोबर 2022 ला राजुरा तालुक्यातील चूनाळा मार्गावर अपघातात वाघाचा मृत्यू झाला होता. 7 मार्च 2023 ला विद्युत तारांच्या संपर्कात आल्यानं बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल 27 नोव्हेंबर 2023 ला नागभीड बाळापूर रेल्वे मार्गावर एक तीन महिन्याच्या वाघाचा मृत्यू झाला.

'या' आहेत उपाययोजना : वन्यजीवांच्या सुरक्षित संचारासाठी वनविभागानं काही पर्यायी सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी खुरटे जंगल आहे, त्या रेल्वे रुळाच्या बाजूनं सुरक्षा जाळी लावण्यात यावी, प्राण्यांना येण्याजाण्यासाठी भूमिगत मार्ग काढण्यात यावा, रेल्वे रुळाच्या बाजूला निर्माण झालेले खड्डे बुजविण्यात यावे, वळणरस्त्यावर रेल्वेची गती कमी करण्यात यावी, अशा उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

रेल्वे विभागानं केलं दुर्लक्ष : नोव्हेंबर 2018 मध्ये तीन बछड्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर वनविभाग तसंच रेल्वे विभागाची संयुक्त बैठक झाली होती. यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या सर्व उपाययोजना सांगितल्या होत्या, मात्र रेल्वे विभागानं त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय.

रेल्वे विभाग सकारात्मक : काल मंगळवारी सकाळी एका वाघाच्या बछड्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचं सामोरं आलं होतं. यानंतर चंद्रपूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांनी रेल्वे मार्गावर वाघ तसंच बिबट्यांचा मृत्यू प्रकरणी त्यांना अहवाल दिला. याबाबत आता रेल्वे विभाग सकारात्मक असून वरीष्ठ पातळीवर लवकरच याबाबत तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती चंद्रपूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

हेही वाचा -

  1. रेल्वेच्या धडकेत एक वर्षीय वाघाचा मृत्यू; गोंदियातील घटना
  2. चार राज्यांतून 2 हजार किमीचा प्रवास करुन महाराष्ट्राचा 'रॉयल बंगाल वाघ' पोहोचला ओडिशात; वनाधिकारीदेखील पडले कोड्यात!
  3. चंद्रपूर परिसरात वाघाची दहशत; मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने केलं ठार
Last Updated :Nov 28, 2023, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.