चंद्रपूर - कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मिठाचा तुटवडा असल्याची अफवा पसरली आहे. मात्र, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा तुटवडा नाही. मोठ्या प्रमाणात मीठ साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.
सावली, सिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये काही लोकांकडून मीठ तुटवडा असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. जिल्ह्यामध्ये मुबलक स्वरूपात मीठाचा साठा उपलब्ध आहे. मिठाचा तुटवडा असल्याबाबत कोणी अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मीठ खरेदीसाठी रांगा लावू नयेत किंवा जास्तीचे पैसे देऊन मीठ खरेदी करू नये. अफवांवर विश्वास ठेवून लोकांनी मीठ जास्तीची खरेदी केल्यास जिल्हयात मीठ संपण्याच्या अडचणीस सामोरे जावे लागेल. मात्र, जिल्ह्यात मीठाचा मुबलक साठा असून विनाकारण मीठ खरेदी करून साठा करू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
दुकानदारांनी याबाबत आवश्यक काळजी घेऊन ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेऊन मीठ विक्री करू नये. तसेच याबाबत येणाऱ्या ग्राहकांना ही खरी माहिती द्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.अचानक वाढलेली मागणी व बाजारपेठेतील मिठाची झालेली कृत्रिम टंचाई याबाबत प्रशासनाने दखल घेऊन नागरिकांना आवाहन केले आहे.
प्रशासनाकडून दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. कोणतीही अफवा असल्याचे लक्षात आल्यास ताबडतोब प्रशासनाला कळवा आणि त्याबाबत खात्री करून घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले आहे.