भंडारा - जिल्ह्यात शनिवारी मध्यप्रदेश राज्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती सोमवारीही कायम आहे. या पुरामुळे अजूनही बरेच नागरिक त्यांच्या घराच्या छतावर अडकून पडले आहेत. तर, ज्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले त्यांच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. पूर येणार याची माहिती सुद्धा प्रशासनाने दिली नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
मध्य प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे संजय सरोवराची दारं उघडण्यात आली आणि त्याचा फटका हा भंडारा जिल्ह्याला बसला. या सरोवराचे पाणी सोडल्यानंतर जिल्ह्याला पूर येईल आणि तो किती भागात येईल याची कल्पना आपत्ती व्यवस्थापनाने नागरिकांना दिली नाही. त्याचा दुष्परिणाम म्हणजे जिल्ह्यात अतिशय वाईट पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुराचे पाणी कमी होणार की वाढणार, रविवारी संपूर्ण दिवसभर नागरिक हा एकच प्रश्न विचारत होते. याविषयी आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना वारंवार विचारूनही माध्यमांना अजिबात उत्तर मिळाले नाही. त्यामुळे, आपत्ती व्यवस्थापन खरंच गंभीर आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 भंडारा ते नागपूर आणि राज्यमार्ग भंडारा ते तुमसर सलग दुसऱ्या दिवशीही बंद आहे. तर, गोसे धरणाचे 33 दारं उघडण्यात आली आहेत. या पैकी 13 गेट 5 मीटरने तर 20 गेट साडेचार मीटरने उघडण्यात आली आहेत. यामधून 30 हजार 116 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. या पुरामुळे भंडारा जिल्ह्यातील 58 गावातील 2 हजार 664 कुटुंब बाधित झालेले आहेत. यामध्ये भंडारा तालुक्यातील 23 गावातील 1790 कुटुंब, पवनी तालुक्यातील 22 गावातील 505 कुटुंब, तुमसर तालुक्यातील पाच गावातील 127 कुटुंब, मोहाडी तालुक्यातील 6 गावातील 167 कुटुंब, लाखांदूर तालुक्यातील दोन गावातील 57 कुटुंबाना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे फसलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम बोलविण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाने ही परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही. त्यामुळेच, जिल्ह्यातील नागरिकांना या पूर परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे भंडारा मतदारसंघाटे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शेकडो नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. या पूर परिस्थितीमध्ये अजूनही बरेचसे नागरिक त्यांच्या घरी अडकलेले आहेत. तर, काही नागरिकांना पोलिसांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी बाहेर काढले आहे. मात्र, या लोकांची व्यवस्था ही प्रशासनातर्फे होत नसल्याची खंत नागरिक बोलून दाखवीत आहेत.
या नागरिकांची सामाजिक कार्यकर्ते आणि काही राजकीय लोकांनी जेवण्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याचे ते सांगतात. प्रशासनाचा हा ढिसाळपणा नागरिकांच्या जीवाशी आलेला आहे. याविषयी आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोनच उचलला नाही. तर, सकाळी दहा वाजेपर्यंतही ते ऑफिसमध्ये न आल्याने त्यांच्यावर लावलेल्या आरोपाविषयी त्यांची भूमिका काय हे समजू शकले नाही.
हेही वाचा - भंडारा पूर: जिल्हाधिकाऱ्यांनी SDRF आणि NDRF टीमला केलं पाचारण